राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ येत्या मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजता माळीवाडा येथे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या हस्ते व पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी दिली. बुधवारी किंवा गुरुवारी तिकिट वाटप केले जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
एकुण ३४ प्रभागांपैकी १ ते १६ मधील इच्छुकांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आ. विद्या चव्हाण, काकडे यांच्यासह आ. अरुण जगताप, दादा कळमकर, शंकरराव घुले, शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, अॅड. अशोक कोठारी, करीमशेठ हुंडेकरी, शिवाजी विधाते यांच्या निवड मंडळाकडून या मुलाखती घेण्यात आल्या. पालकमंत्री पिचड अनुपस्थित होते.
एकुण १६ प्रभागातून एकुण ६० इच्छुकांनी उमेदवारीसाठी नावनोंदणी केली होती. प्रभाग २, ७, १३ मध्ये दोघे इच्छुक आहेत तर प्रभाग ९, ११, १६ मध्ये इच्छुकांची संख्या ५ ते ६ च्या दरम्यान आहेत, प्रभाग ८, १२, १४ मध्ये किमान ७ ते ८ इच्छुक आहेत. उद्या (रविवारी) प्रभाग १७ ते ३४ मधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. विद्यमान नगरसेवक अरिफ शेख, दत्ता सप्रे, पोपट बारस्कर, विनित पाऊलबुद्धे, आयुब शेख यांच्या पत्नी शफिया, समदखान, इंदरकौर गंभीर यांच्यासह अभिषेक कळमकर, उपप्राचार्य रावसाहेब पवार, कुमार नवले आदी प्रमुख इच्छुकांचा आजच्या मुलाखतीत समावेश होता.
पक्षाने काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला व प्रत्यक्षात बोलणी सुरु झाली असली तरी मुलाखतीच्या वेळी पुन्हा इच्छुकांना काँग्रेसबरोबर आघाडी करावी का याबद्दल विचारणा केली जात होती. काही ठिकाणी महिला उमेदवार उपलब्ध न झाल्याने काकडे यांनी इच्छुकांवरच महिला उमेदवारांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवली. सध्या मनपामध्ये राष्ट्रवादी हाच प्रथम क्रमांकाचा पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसबरोबर चर्चा होताना सन्मानपुर्वक जागा मिळाल्या तरच आघाडी केली जाईल, असे सांगताना काकडे यांनी पुन्हा आगामी लोकसभा व विधानसभेला सामोरे जाताना समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी आघाडी होत, असल्याकडे लक्ष वेधले. काँग्रेसशी अद्याप जागा वाटपाचे सूत्र ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.