शहरातील गुन्हेगारी व राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू असून ते कायमस्वरूपी बंद करावेत, या मागणीसाठी समाजवादी पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.
पंचवटीत बिपीन बाफना या ओझरच्या युवकाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ८ जून रोजी फिर्याद दाखल असताना १४ जूनपर्यंत पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास विलंब का लावला, असा सवाल करण्यात आला आहे. मृतदेह सापडल्यानंतर फक्त सहा तासांतच संशयितांना जेरबंद करणाऱ्या पोलिसांनी हीच तत्परता आधीच दाखविली असती तर बाफनाचे प्राण वाचले असते, असे पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यातील ज्या कर्मचाऱ्यांची बदली होऊनही ते तिथेच कार्यरत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, शहरात परराज्यातून येणाऱ्या वाहनांची अडवणूक करून त्यांच्याकडून ‘पीयूसी’ प्रमाणपत्राच्या नावाने व इतर कागदपत्र तपासण्याच्या नावाने हजारो रुपयांची लूट शहरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून व शहर वाहतूक शाखेच्या   कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
शहर वाहतूक शाखेचे काही कर्मचारी वाहतूक सुरक्षेकडे लक्ष न देता वाहन चालकांशी अर्थपूर्ण व्यवहार करीत असतात. संबंधितांवर कार्यवाही करावी तसेच गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई न करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.