राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०११ स्पर्धेत लातूर शहरातील मुलींच्या आयटीआयला दुसऱ्या क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य वि. के. गाडेकर यांनी या कामी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदनही करण्यात आले आहे. मुलींच्या आयटीआयने सन २०११मध्ये परिसरात २ हजार ३०० वृक्षांचे संवर्धन केले. परिसर सुशोभित केला. विद्यार्थिनींच्या प्रवेशक्षमतेत १९२ने वाढ केली. कॅम्पस मुलाखत व रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून १२९ मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. अल्पमुदत प्रशिक्षण योजनेंतर्गत ५२१ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापूर्वीच्या ४ वर्षांत २८० महिलांना प्रशिक्षित करून शिवणयंत्राचे वाटप केले.
विविध योजनांतर्गत उपक्रम राबवून २१ लाख महसूल जमा केला. व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सन २००६ ते २०११ दरम्यान सलग सहा वेळा संस्थेला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले.
पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तिपत्र व संस्था विकासासाठी ६ लाखांचा निधी असे असून, समारंभपूर्वक तो देण्यात येणार आहे. आयटीआयचे प्राचार्य अजय त्रिचूरकर असून, बी. एन. प्रवीण, गुरुनाथ, मगे, आशा भिसे, अनिरुद्ध कुर्डूकर   आदींनी   त्यांना सहकार्य केले.