पर्यावरणाचे दिनाचे निमित्त साधून उपराजधानीत प्लास्टिकमुक्त नागपूर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी गेल्या काही दिवसात शहरात भाजी विक्रेत्यांपासून मोठय़ा शॉपिंग मॉल्समध्ये प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असून संबंधित दुकानांवर व मॉल्सवर कारवाई केली जात नाही. प्लास्टिक मुक्त नागपूर योजना राबविली जात असली तरी बाजारात खुलेआम प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना दिले जाते त्याचे काय, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
शहरातील विविध भागातील बाजारात भाजीपाला किंवा कुठलीही वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदारांकडे प्लास्टिकच्या पिशव्या मागणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. प्लास्टिक पिशव्याच्या संदर्भात महापालिकेतर्फे अनेकदा जनजागृती करण्यात आली असून पर्यावरणा दिनाच्या दिवशी प्लास्टिक मुक्त नागपूर योजनेला प्रारंभ केला. पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी रस्त्यावरील प्लास्टिक उचलून एक दिवस जनजागृती केली. मात्र, त्याचा आता काहीच परिणाम होताना दिसत नाही.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर तसेच त्याचा साठा करून ठेवून विक्री करण्यावर बंदी घातलेली असताना मोठय़ा प्रमाणात अशा प्लास्टिक पिशव्याचा उपयोग होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक वर्षांपूर्वी कारवाई केली होती आणि प्लास्टिकचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांकडून दंड आकारण्यात आला होता. शहरातील दुकाने व भाजीविक्रेते यांच्याकडून दररोज घेतल्या जाणाऱ्या पिशव्यांचे प्रमाण तीस ते दीडशे एवढे आहे. एका दुकानातून दररोज एवढय़ा प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या जात असतील तर अख्ख्या नागपूर शहरातून घेतल्या जाणाऱ्या पिशव्यांचे प्रमाण किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. ‘प्लास्टिकची पिशवी मागू नका’ अशी पाटी लिहिलेल्या दुकानातही दुकानदार प्लास्टिक पिशव्या ठेवतात. ज्या ग्राहकांकडे पिशव्या नसतात त्यांना आम्ही देतो. नाहीतर ते माल घेतच नाहीत. आमचाही नाईलाज आहे, असे दुकानदारांचे म्हणणे असते. घरून निघताना कापडी पिशवी घ्यायला विसरलो हे कारण ग्राहक सांगतो. आपली आजी किंवा पणजी त्याकाळी बाजारात भाजी आणायला जात होत्या ना? तेव्हा त्या कापडी पिशवीच नेत असत. मग आपण एक छोटी पिशवी जवळ बाळगायला काय हरकत आहे?

महाराजबाग, अंबाझरी, फुटाळा तलाव, सोनेगाव तलाव, बालोद्यान या ठिकाणी तर लोकांच्या निष्काळजीपणाचा कहर झाला आहे. उद्यानात येणारे प्लास्टिकच्या पिशव्या सोडून निघून जातात. यावर उपाय म्हणून महापालिकेने कचरा कुंडी ठेवली होती, मात्र त्याचा उपयोग नागरिक करीत नसून रस्त्यावर या पिशव्या फेकून दिल्या जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून शहरातील नदी नाल्याचे पाणी अडले जाते. शिवाय पाळीव प्राणी, वन्यजीवांचे अतोनात नुकसान होते.

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साठू लागले की, आपण शासन व प्रशासनावर टीका करतो. पण सामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात आपण दुर्लक्ष करीत असतो. ८० ते ९० टक्के लोकांनी पिशव्या घेणे बंद केले तरीही याचा पर्यावरणाला हातभार लागेल. मॉल्स, बाजारपेठा, भाजीबाजार, उद्यान, पर्यटनाची ठिकाणे, विद्यापीठ परिसर आदी ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन प्लास्टिक बंदी करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा येत्या काळात हा प्लास्टिकचा भस्मासूर नागरिकांचे बेहाल केल्याशिवाय राहणार नाही.

प्लास्टिक पिशव्यावर यापूर्वी अनेकदा बंदी घालून कारवाई करण्यात आली. साधारणत: दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन अधिकारी कारवाई करतात. नागरिकांनी जागृत होऊन प्लास्टिक पिशव्याचा वापर करणे टाळले तर त्याचा उपयोग होणार नाही. प्लास्टिकमुक्त योजना राबवित असताना नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर म्हणाले.