जिल्हा मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने निफाड तालुक्यातील मरळगोई येथे आयोजित आढावा बैठकीत शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांसंदर्भात जागृती करण्यात आली. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिरसाठ यांनी समाजहितासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना असून समाजाने केवळ शिक्षण घेऊन चालणार नाही, तर गुणवत्तेतदेखील चमकले पाहिजे, असे आवाहन केले. व्यावसायिक प्रशिक्षणाचे धडेदेखील घेतले पाहिजे. समाजात अजूनही अंधश्रद्धा मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांचा त्याग करून जगाबरोबर बदलले पाहिजे, अशी भूमिका शिरसाठ यांनी मांडली. याप्रसंगी समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, उपाध्यक्ष मधुकर बळसाणे, भास्कर पगारे, चंद्रभान साळवे आदी उपस्थित होते. समितीने आतापर्यंतच्या केलेल्या कामाचा लेखाजोखा प्रास्ताविकातून काळे यांनी मांडला. यू. के. अहिरे यांनी मातंग समाजाची पतसंस्था लवकरच कार्यरत होईल, असे सांगितले. बैठकीत निफाड तालुक्याच्या उपाध्यक्षपदी लाखलगाव टाकळीचे सरपंच मारुतीराव राजगिरे तसेच सुरगाणा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वेणूबाई भालेराव, जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास जाधव, निफाड तालुका सरचिटणीसपदी विठ्ठल राजगिरे, उत्तमराव पगारे आदींना निवडीचे पत्र देण्यात आले.