केव्हातरी अतिक्रमण हटाव मोहीम मनपातर्फे करण्यात येते. त्याचा गाजावाजा झाला की, ती लगेच बंदही करण्यात येते. हा आटय़ापाटय़ाचा खेळ म्हणजे मनपातील अधिकाऱ्यांच्या व नगरसेवकांच्या राजकारणाचा भाग झाला आहे, असे दिसून येत आहे. शहरातील अतिक्रमणे हटविण्यात मनपा प्रशासनाचे निश्चित धोरण नाही. अतिक्रमणे दिसत असूनही मनपा प्रशासनातील अधिकारी त्याकडे हेतूपुरस्सर कोनाडोळा करतात व जेथे काही तरी आहे, असे दिसून आल्यास मग अतिक्रमण पाडण्याची थातुरमातूर कारवाई करण्यात येते. गोरक्षण मार्गावरील अतिक्रमण अर्धवट पाडून मनपा प्रशासनाने याचा ताजा प्रत्यय दिला आहे.गोरक्षण मार्गावरील जुन्या आयकर चौकात गोविंद सोडडा व पुरुषोत्तम साधवाणी यांनी चार मजली मोठे बांधकाम केले आहे. ते काही प्रमाणात दुसऱ्याच्या जागेत गेले असल्याची तक्रार मनपा प्रशासनाक डे काही लोकांनी केली होती, पण प्रशासनाने त्या तक्रारींची दखल घेतली नाही. मात्र, इतर प्रभागाचे नगरसेवक आनंद बलोदे यांनी याबाबत तक्रार करताच अतिक्रमण विरोधी पथकाने बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू केली व काही भ्रमणध्वनीवर संदेश झाल्यावर आटोपती घेण्यात आली. अशा इमारती पाडण्याचे किंवा ते थांबविण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आहेत व क्षेत्रीय अधिकारी पुंडे यांनी ही कारवाई थांबविण्यास सांगितले, असे अतिक्रमण हटविणारे अधिकारी विष्णू डोंगरे यांनी सांगितले. याबाबत कैलास पुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, आयुक्त डॉ.उत्कर्ष गुटे यांच्या आदेशावरून ही कारवाई थांबविण्यात आली. अतिक्रमणधारकाने आपण जास्तीचे बांधकाम १० दिवसात दूर करतो, असे मनपा प्रशासनाला पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. अनधिकृत वा अतिक्रमणधारक जर न्यायलयात गेला तरी जे बांधकाम अनधिकृत घोषित केले जाते त्या बांधकामाच्या पाडण्याला न्यायालय स्थगिती देत नाही, असे जाणकार अधिकाऱ्यांनी सांगितले.