कार्तिकी एकादशीसाठी सुमारे तीन लाख वारकरी पंढरीत दाखल झाले असून पंढरी वारकरी, भाविकांनी पूर्ण गजबजून गेली आहे. यात्रेवर महागाई, आंदोलन याचा परिणाम जाणवत आहे.
कार्तिकी यात्रा ही जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असून विशेषत: घोडय़ांचा बाजार प्रसिद्ध असून या बाजारात मोठय़ा प्रमाणात घोडे विक्रीस आले असून यामुळे या बाजारास वैभव आले आहे.
यात्रेच्या निमित्ताने शहराच्या विविध भागात प्रासादिक दुकाने लागली आहेत. स्वच्छतेसाठी हंगामी ७०० कर्मचारी लावले आहेत. न.पा. सोयीसाठी सज्ज झाली आहे.
गेले अनेक दिवस तुटपुंजे अन् गढूळ खड्डेमय पाण्यात येणारे भाविक पाय व अंघोळ करून चंद्रभागा स्नान दर्शन घेत होते. वारीत भाविक वारकऱ्यांसाठी स्नानाची सोय व्हावी म्हणून धरणातून १६०० क्युसेक्स पाणी सोडले असून पाणी नदीच्या पात्रात येत आहे. वाळवंटही वारकऱ्यांनी फुलून गेले आहे. पंढरीतही गर्दी होत आहे.
नुकतीच कसाबला दिलेली फाशी त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी कार्तिकी यात्रा येथे लाखो लोक येतात. येणाऱ्या लोकांची संरक्षणाची जबाबदारी पंढरपूर पोलीस दलाची असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम, शहर निरीक्षक दयानंद गावडे यांनी दक्षता म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून सुरक्षा यंत्रणा चोख ठेवली आहे. शहरात साध्या वेशात गस्तीवर पोलीस असून वाळवंट, प्रदक्षणा रोड येथे पोलीस गस्त घालत आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, अतिरिक्त अधीक्षक तुषार दोशी यांनी यात्रेची पाहणी केली.