महापालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे घोडे तीन जागांवर अडले आहे. केडगावसहित इतर जागा निश्चित झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी दोन्ही काँग्रेसमधील ३०-३८ की ३२-३६ या सूत्राचे समीकरण सुटलेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुक घायकुतीला आले आहेत. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत ‘मैत्रिपूर्ण लढत नाहीच’ या सूत्रावर मात्र दोन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केल्याचे समजले. दोन्ही पक्ष जागावाटपाचे सूत्र रविवारीच जाहीर करणार आहेत.
दोन्ही काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डच्या स्वतंत्रपणे मुंबईत बैठका झाल्या. त्यामध्ये मैत्रिपूर्ण लढतीवर काट मारण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जाते. काँग्रेसच्या बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा अनुपस्थित राहिले, त्याची जोरदार चर्चा पक्षात झडत आहे, ही अनुपस्थिती पक्षाच्या श्रेष्ठींनी गांभीर्याने घेतल्याचा दावाही केला जात आहे. गेल्या तीन दिवसांत दोन्ही पक्षांतील चर्चेची गाडी संपर्काअभावी पुढे सरकलेली नाही. उद्याही, शनिवारी चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे. थेट रविवारीच दोन्ही पक्षांतील पदाधिकारी चर्चा करणार असल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीनुसार केडगाव उपनगरातील ८ पैकी सात जागा काँग्रेसने लढवण्याचे ठरवले आहे. मागील निवडणुकीतही हेच सूत्र होते. ते यंदाही कायम ठेवले गेले आहे. प्रभाग ८, १८ व २८ या तीन जागांवर राष्ट्रवादीने दावा कायम ठेवला आहे. या जागा काँग्रेसलाही हव्या आहेत. या जागा जर काँग्रेसला हव्या तर केडगावमधील तीन जागा आम्हाला द्या, असा राष्ट्रवादीचा प्रस्ताव आहे. सध्याच्या चर्चेनुसार होणारे ३२-३६ व ३०-३८ हे सूत्र दोन्ही पक्षांनी मुंबईतील बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढे मांडले आहे, त्यास संमतीही मिळाली आहे. मात्र या तीन जागांचा तिढा स्थानिक पातळीवरच सोडवा, अशी सूचना जिल्हय़ातील पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
काँग्रेसचे निरीक्षक आ. शरद रणपिसे व राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे दोघेही रविवारी नगरला येणार आहेत, त्यानंतरच चर्चेची गाडी पुढे सरकेल. दोन्ही पक्ष रविवारीच पक्षाची पहिली यादी स्वतंत्रपणे जाहीर करणार आहेत. ज्या तीन जागांवर आघाडीचा तिढा अडला, त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील अंतर्गत वादाची किनारही अडकलेली आहे.
काल मनसेने २७ उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र काँग्रेस आघाडीचा चर्चेचा घोळ न मिटल्याने आघाडीतील उमेदवार आता घायकुतीला आले आहेत.