पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, तसेच जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात या मागणीसाठी मांदळी (ता. कर्जत ) येथे आज सकाळी रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यात काही शेतकऱ्यांना चांगलाच मार बसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गुलाबराव तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता नगर-सोलापूर रस्त्यावर मांदळी येथे आंदोलन सुरू झाले. कुकडीचे पाणी, जनावरांच्या छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, रोजगार हमीची कामे सुरू करावीत या मागण्यांसाठी निमगाव गांगर्डा, घुमरी, बेलगाव, थेरगाव, मांदळी, रमजान चिंचोली, कोंभली, चांदेबुद्रुक येथील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वच गावांत तीव्र पाणी व चारा टंचाई आहे. प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला, असे तनपुरे यांनी सांगितले.
रस्ता अडवून बसलेल्या आंदोलकांसमोर बेलगावचे उपसरपंच हरिभाऊ बाबर, भाऊसाहेब अनभुले, रावसाहेब गांगर्डे, हरिदास केदारी यांची भाषणे सुरू होती. ते बोलत असतानाच कर्जतचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी त्यांच्याकडून ध्वनीक्षेपक हिसकावून घेतला. भाषणे बंद करा, रस्त्यावर सोडलेल्या बैलगाडय़ा, जनावरे त्वरित बाजूला घ्या, रस्ता मोकळा करा असे ते सांगायला लागले. तहसीलदार येत नाहीत तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
त्याचा ढोकले यांना राग आला. तनपुरे, तसेच आंदोलनाचे अन्य नेते त्यांना समजावून सांगत होते. मात्र, ढोकले काही ऐकतच नव्हते. शाब्दीक वाद सुरू झाला व नंतर पोलिसांनी अचानक लाठीमार सुरू केला. आंदोलक त्यामुळे गांगरून गेले. त्यातील काही पळू लागले. काहींनी काठय़ांचा मार लागला. नेते व आंदोलक पोलिसांच्या या बळाच्या वापरामुळे अधिकच आक्रमक झाले. पोलिसांनाच नंतर शांततेची भूमिका घ्यावी लागली. पिण्याच्या पाण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या ढोकले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तनपुरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.     
पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – शिंदे
दरम्यान, या आंदोलनात शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार राम शिंदे यांनी नगरला पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांची भेट घेऊन केली. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस निरीक्षक ढोकले यांनी कोणताही आदेश नसताना आंदोलकांवर लाठीमार केला, तसेच शिवीगाळ करून शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली.