तालुक्यात बियाणांमधील भेसळीमुळे एकाच वाणाऐवजी विविध प्रकारच्या वाणाची भातशेती दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून भेसळीच्या बियाणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. तर बियाणांविषयी करण्यात येणारा आरोप निराधार असल्याचा दावा तालुका अॅग्रो डिलरकडून केला जात आहे.
तालुका भातशेतीसाठी प्रसिध्द आहे. त्यातही घोटीचा तांदूळ हा महाराष्ट्रात लौकीकप्राप्त आहे. पावसाळ्यातील पीक म्हणून भातशेतीकडे पाहिले जाते. वर्षांनुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेतकरी भात उत्पादन घेतात. आधुनिक बियाणे बाजारात उपलब्ध होत असतानाही शेतकरी घोटीच्या भात बियाणाची खरेदी करतात. भात बियाणात भेसळ असल्याची तक्रार रोपे तयार करण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी केली होती. यंदा भेसळीच्या बियाणामुळे भातशेती संकटात सापडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी भातपिके घेतली. मात्र शेतात एकाच वाणाऐवजी विविध प्रकारची भातशेती दिसू लागली. याबाबत शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडे तक्रारी केल्या असता शेतकऱ्यांच्या चुकांमुळे ‘भातात भेसळ’ वाढल्याचे पत्रक काढण्यात आले.
 शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाऐवजी पारंपरिक पद्धतीने शेती करावी असा उपरोधिक सल्ला देवून पत्रक प्रसिद्ध केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही शेतकऱ्यांनी तहसीलदार, लोकप्रतिनिधी, कृषी अधिकारी यांना गाठून तक्रारी केल्या. अनेक विक्रेत्यांनी बियाणांबाबत पावत्याही दिलेल्या नाहीत. एका बाजूला भातपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असताना दुसऱ्या बाजूला या भेसळयुक्त पिकामुळे शेतकऱ्यांची मोटय़ा प्रमाणावर आर्थिक हानी होत आहे.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी गुलाबराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली याबाबत पंचनामे करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती दिली. तालुका अॅग्रो डिलरकडून बियाणे कंपन्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पत्रक काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार बियाणे विक्रेते करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व संबंधित विक्रेते, बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करावी अन्यथा तालुका कृषी कार्यालयास हजारो शेतकरी घेराव घालतील, असा इशारा पंचायत समिती सदस्य    पांडुरंग वारूंगसे यांनी दिला आहे.