चिपळूण येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयातर्फे पाच लाख रुपयांची देणगी गुरुवारी देण्यात आली. कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले,‘‘साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राज्याची सांस्कृतिक समृद्धी वाढविण्याचे काम संमेलनाने केले आहे. त्यामुळे अशा संमेलनांना मदत करताना आनंद वाटतो. कोकणच्या भूमीत होत असलेल्या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल.’’
प्रकाश देशपांडे म्हणाले,‘‘भारती विद्यापीठासारख्या प्रगतशील विचारांच्या संस्थेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने केलेली मदत मोलाची आहे. कोकणच्या मातीत २२ वर्षांनी होणारे हे संमेलन वैशिष्टय़पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’