‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येत असला तरी विदर्भात रक्तदात्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाल्यामुळे रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा केला जाऊ शकत नसल्याची माहिती लाईफ लाईन ब्लड बँकचे प्रमुख हरिश वरभे यांनी दिली. गेल्या काही वर्षांत विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबिरे आयोजित केली जात असली तरी त्यातून पाहिजे त्या प्रमाणात रक्तदान होत नाही.
या देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ १ कोटी २० लाख लिटर रक्त पुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी ७४ लाख युनिट रक्त उपलब्ध झाले होते. आवश्यकतेनुसार ४० टक्के रक्ताची कमी होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात. विदर्भात १० हजार लिटर रक्ताची आवश्कता आहे मात्र, त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये रक्ताची आवश्यकता असताना त्यांच्याकडे तेवढा साठा उपलब्ध नसल्याचे एका सर्वेक्षणानुसार लक्षात आले आहे. काही खाजगी रक्तपेढींमध्ये जास्तीचे पैसे घेऊन रक्त दिले जात असल्याच्या तक्रारी असल्या तरी त्याबाबत फारशी माहिती नाही.
साधारणत १८ ते ६५ या वयोगटातील लोकांना रक्तदान करता येऊ शकते. ज्यांचे वजन साधारणत ७४ किलो आहे त्यांच्या शरिरात ५ लिटर रक्त असल्याचे वरभे यांनी सांगितले. आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही. शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाही. एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे. मधुमेह असलेले रुग्ण जर इन्शुलिन घेत असतील तर त्यांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना शरिरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. रक्तदानानंतर शरिरात रक्ताची पूर्ती २४ तासात होते. रक्तदाताच्या शरीरातून ३५० किंवा ४५० मि.लि. पर्यंत रक्त घेऊ शकतात. जे नेहमीच रक्तदान करतात त्यांना मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि रक्तचापसारखे आजार होत नाही, असेही वरभे म्हणाले.
रक्त तपासणी संदर्भात न्युट्रिक अ‍ॅसिड टेक्नॉलॉजी निर्माण झाली आहे. मात्र, ती केवळ मुंबई आणि दिल्लीत आहे. नागपुरात नाही. भारतात २ हजार ७५० रक्तपेढय़ा आहेत, तर महाराष्ट्रात २८२ आणि नागपुरात १५ रक्तपेढय़ा आहेत. या माध्यमातून रक्तपुरवठा रुग्णांना रक्तपुरवठा केला जात असला तरी अजून बरीच आवश्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन लाईन लाईन ब्लड बँकेतर्फे करण्यात आले.
यावेळी दीपक लालवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष आनंद शर्मा उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood donation great donation just remain slogan
First published on: 27-11-2013 at 09:31 IST