गतवर्षी दुष्काळाने आíथक खाईत लोटलेला शेतकरी यंदा मात्र चांगले पीकउत्पादन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. प्रामुख्याने बागायतदार शेतकऱ्यांकडून जास्तीच्या उत्पादनावर भर देण्यात येत आहे. परंतु गेल्या ३-४ दिवसांपासून तयार झालेले ढगाळ हवामान, तसेच अवेळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांसह आंबा उत्पादकांनाही हुरहूर लागली आहे. विशेषत नेकनूर येथील हूर आंब्याच्या मोहरावर ढगाळ वातावरणाचा परिणाम जाणवू लागला आहे.
जिल्हय़ात गेल्या ३-४ दिवसांपासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवेळी पावसामुळे बागायतदारांना हुरहूर लागली आहे. द्राक्षउत्पादकांनी अलीकडेच आपली द्राक्षे बीडच्या बाजारपेठेत आणण्यास सुरुवात केली होती. त्यातच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना संभाव्य नुकसानीच्या भीतीने ग्रासले आहे. बीड तालुक्यातील बोरफडी, डोईफोडवाडी, तसेच केज तालुक्यातील मस्साजोग येथे द्राक्षांच्या बागा आहेत. बहुतांश ठिकाणी आमराईला मोहोर लगडला आहे. बोरफडी व डोईफोडवाडी येथे द्राक्षाच्या बागा आहेत. मस्साजोग येथे ३-४ ठिकाणी द्राक्षउत्पादन घेतले जाते. नेकनूर हुर आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबा राज्यासह परराज्यात मोठय़ा प्रमाणात जातो. जिल्हय़ातील जनतेला ‘हुर’ची चव चाखल्याशिवाय आंब्याचा मोसम सुरू झाल्याचे वाटत नाही. हुर आंब्याने राज्याच्या मोठय़ा शहरातील बाजारपेठेत गोडी निर्माण केली आहे.
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांसह आंबा उत्पादकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. आंब्याचा मोहोर ढगाळ वातावरणामुळे गळून पडू लागला आहे. आंब्यावर अनेक ठिकाणी तुडतुडय़ांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. नेकनूर येथील हुर आंब्यालाही नुकसानीची झळ सोसावी लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onबीडBeed
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloudy climate farmer in trouble
First published on: 24-01-2014 at 01:50 IST