देशाची आर्थिक राजधानी असेलल्या मुंबई शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. देशातील एकूण गुन्ह्य़ांपैंकी ६ टक्के गुन्हे एकटय़ा मुंबई शहरात नोंदविले जात आहेत. मुंबईप्रमाणे राज्यातल्या गंभीर गुन्ह्य़ांचेही प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हे आणि महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार महिला आणि वरिष्ठ नागरिकांवरील अत्याचार तसेच सायबर गुन्ह्य़ात महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. महाराष्ट्रात बलात्कार, विनयभंग, अपहरण आदी महिलांच्या गंभीर २६ हजार ६८३ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र महिला अत्याचारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातल्या अन्य गुन्ह्य़ांमध्ये हत्या (२,६७०), बलात्कार करून हत्या (२१), प्रेमसंबंधातून हत्या (१०४) आदींचा समावेश आहे. वरिष्ठ नागरिकांवरील अत्याचारातही वाढ झाल्याचे अकडेवारीत दिसून येत आहे. गेल्या वर्षांत राज्यात वरिष्ठ नागरिकांवर झालेल्या अत्याचाराचे ३ हजार ९८१ गुन्हे दाखल करण्यात आले. देशाच्या तुलनेत त्याचे प्रमाण २१ टक्के एवढे आहे. लहान मुलांवरील अत्याचारात २०१३ त्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३ मध्ये बालकांविरोधातील ६ हजार ४१० गुन्ह्य़ांची नोंद होती. तर २०१४ मध्ये ८ हजार ११५ गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर गुन्ह्य़ांमध्येही महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून १ हजार ८७९ सायबर गुन्ह्य़ांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यात सर्वाधिक सायबर गुन्ह्य़ांची नोंद आहे. * महिलांवरील अत्याचारात मुंबई हे दिल्लीपाठोपाठचे दुसरे शहर ठरले आहे. मुंबईत २०१४ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे साडेतीन हजार गुन्हे नोंदविले गेले. त्यात २०१३ च्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये ५५ टक्के तर विनयभंगाच्या घटनांमध्ये ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. * २०१३ या वर्षांत मुंबईत बलात्काराच्या ३९४ आणि विनयभंगाच्या १ हजार ६०७ घटना घडल्या होत्या. चालू वर्षांत हे प्रमाण वाढले असून ६१६ बलात्कार आणि २ हजार ६८८ विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. * याशिवाय सामूहिक बलात्कार (१६), विनयभंग (३६३), हुंडाबळी (२२) ची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीपाठोपाठ महिला अत्याचारांमध्ये मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर ठरली आहे. * हत्यामध्ये मुंबई देशात चौथ्या क्रमांकावर आहे. २०१४ या वर्षांत देशात एकूण ३ हजार ६३२ हत्या झाल्या. त्यात मुंबईत १८७ हत्या झाल्या असून मुंबई देशात चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली (४९६), बंगळूर (२४६), पटणा (२०६) अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर आहे. याशिवाय मुंबईत चोरी (१०,११०), जबरी चोरी (२१०२) आदी गुन्ह्य़ांची नोंद झालेली आहे.