महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील अभियंता राजेंद्र ताडे यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिंगणापूर योजनेची संपूर्ण जबाबदारी ताडे यांच्यावर होती; परंतु या योजनेमध्ये महापालिकेचे नुकसान केले असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या योजनेसाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु अस्तित्वातील गळती रोखण्यास फारसे यश आल्याचे दिसून येत नाही. आजही प्रत्येक पंधरा दिवसाला शहरातील कोणत्या ना कोणत्या भागास या गळतीचा फटका बसून अपुरा पाणीपुरवठा होतो.
या निकृष्ट कामामुळे महापालिकेचा तोटा झालेला आहे. कामाला विलंब केल्याबद्दल ठेकेदारांना ३१ लाख रु पये दंड वसूल करण्यात आला आहे; परंतु काम वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी वाया जाऊन महापालिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कोल्हापूर शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेत वारंवार निर्माण होणाऱ्या गळत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र व सुजल व निर्मल अभियान योजना राबविण्यात आली. या योजनेत गळती असणाऱ्या ठिकाणी पाइप बदलून गळतीचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. या योजनेची संपूर्ण देखरेख व इतर सर्व जबाबदारी ताडे यांचीच होती. या सर्व प्रकरणामध्ये उपजलअभियंता यांच्यासोबत इतरही वरिष्ठ अधिकारी सामील असण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून पाण्याचे वाटपही असमतोल प्रमाणात होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाची व अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी पत्रकाद्वारे केली आहे.