व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने शेवगाव ग्रामपंचायतीने जाहीर केलेला ३३ गाळ्यांचा लिलाव स्थगित ठेवण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सभापती हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी निवेदन देऊन केली.
निवेदनात म्हटले की, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ३३ गाळ्यांत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून व्यापारी व्यवसाय करत आहेत, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जानेवारी २०१३ मध्ये संपत आहे, त्यापूर्वी निवडणूक होत आहे. त्यातून व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्यासाठी गाळ्यांचा लिलाव करण्याचे खूळ पदाधिकाऱ्यांनी काढले आहे.
लिलाव करण्यासाठी गाळे खाली करण्याच्या नोटिसा संबंधित व्यापाऱ्यांना पाठवल्या गेल्या आहेत. नोटिसांमुळे व्यापाऱ्यांत घबराट आहे. अनेक वर्षे गाळ्यात व्यापार करणाऱ्यांना आपल्याकडे अनावश्यक हेलपाटे मारायला लावण्याचा त्यामागे उद्देश आहे, जाहीर लिलाव करण्याच्या ग्रामपंचायतीच्या ठरावास सदस्य मिरा भाऊसाहेब उंडे, लक्ष्मीबाई सकाहरी भुजबळ व नंदकिशोर सारडा यांनी विरोध केला आहे.
लिलाव करण्यास व्यापाऱ्यांचाही विरोध आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या आर्थिक घोटाळ्यावरुन अन्यत्र लक्ष वळवण्यासाठी व व्यापाऱ्यांना त्रास देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नोटिसा पाठवल्या आहेत.
यावेळी जनशक्ती मंचचे अ‍ॅड. विद्याधर काकडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, संजय नांगरे, नाना कर्डिले, राजू मेहेर आदी उपस्थित होते.