पिंपळगावजोगेचे रब्बी आवर्तन सुरू
पिंजळगावजोगे धरणातून रब्बी पिकांसाठी कालपासून आवर्तन सुरू झाले. या आवर्तनात तालुक्यातील नऊ पाझर तलाव व तीन टेल टँक भरून देण्याची मागणी तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसने गुरूवारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वेळी पुणे जिल्ह्य़ातील बेल्हे शिवारात कालवा फोडून त्या भागात पाणी वळविण्यात आल्याने आवर्तन सुटूनही तालुक्याला त्याचा फारसा लाभ होऊ शकला नाही.
राज्यात दुष्काळी स्थिती असताना पिंपळगावजोगे लाभक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले असून पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास सर्वांना पुरेसे पाणी मिळून दुष्काळावर मात करणे शक्य असल्याचे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील पाडळीआळे, अळकुटी, पाबळ, लोणीमावळा, पारनेर साखर कारखाना, देवीभोयरे फाटा, देवीभोयरे व वडझिरे या गावांना या आवर्तनाचा फायदा होणार असून याच परिसरातील नऊ पाझर तलाव, तसेच तीन टेल टँक पाण्याने भरून घेतल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासही मोठी मदत होईल.
 देवीभोयरे फाटय़ावरील टेलटँक पूर्ण क्षमतेने भरल्यास जूनपर्यंत संपूर्ण तालुक्याला तेथून टँकरदवारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यात सरकारचाही फायदा होईल. रब्बीसाठी सोडण्यात आलेल्या या आवर्तनाचा तालुक्यातील ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार असून पाझर तलाव व टेलटँक भरल्यास तालुक्यातील दुष्काळाची तीव्रताही कमी होईल, असे आत्माचे अध्यक्ष शैलेंद्र औटी यांनी सांगितले.