जामखेड तालुक्यातील गोयकरवाडा व खरातवाडी येथे सुरू असलेले बेकायदेशीर खडीक्रशर व खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात या मागणीसाठी या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचे निवेदन आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यात म्हटले आहे की, गोयकरवाडी व खरातवाडी या दोन्ही गावांत मागील पाच वर्षांपासून अशोक विठ्ठल ननावरे हे अवैधरीत्या खोदकाम करीत आहेत. शिवाय याच परिसरात पाच खडीक्रशर मागील सहा महिन्यांपासून बेकायदेशीररित्या चालवले जात आहेत. या खाणीमुळे परिसरातील शेतकरी उध्दवस्थ झाले आहेत. त्यांच्या जमिनीचे, घरांचे व शेतातील पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी संदीप कोकडे यांना ननवरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. मात्र, कोकडे व जामखेडच्या तहसीलदारांनी केवळ किरकोळ दंड करून कारवाई केली. हा सर्व प्रकार पूर्णपणे बंद करण्यासाठी आंदोलन छेडले जाणार आहे.