प्रचलित शिक्षणप्रणालीपुढे गुणवत्ता व उत्कृष्टता ही दोन मोठी आव्हाने असून प्राप्त परिस्थितीत शिक्षणाला आध्यात्मिक व नैतिक बळ येण्यासाठी ज्ञान-विज्ञानाची जोड द्यायला हवी, असे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांनी केले.
येथील श्राविका संस्थानगरात शनिवारी सकाळी दक्षिण भारत जैन सभेच्या ९३ व्या अधिवेशनास प्रारंभ झाला. त्यावेळी ‘शिक्षण: २०२०’ या विषयावर डॉ. धारूरकर हे बोलत होते. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार शरद पाटील व गजेंद्र ऐनापुरे यांच्या संयुक्त हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सकल जैन समाजाचे अध्यक्ष रतनचंद शहा, उपाध्यक्ष प्रद्युम्न गांधी, महिला संघटक माधुरी पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब पाटील, स्वागताध्यक्ष हर्षवर्धन शहा, यशवंत अकादमीचे शीतल पाटील, सागर चौगुले, अण्णासाहेब पाटील आदी उपस्थित होते. या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे व अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी सोलापूर विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु हे दोघेही पाहुणे अधिवेशनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी दुसऱ्या पाहुण्यांना पाचारण करावे लागले. डॉ. धारूरकर म्हणाले, शिक्षणात गुणवत्ता, उत्कृष्टता व तंत्रज्ञान पाहावयास मिळत असले तरी, संस्कार मागे पडत आहेत.  त्यामुळे मूल्यांची धारणा असलेली शिक्षणप्रणाली निर्माण करणे गरजेचे आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाप्रमाणेच भाषा व सामाजिक शास्त्रांच्या शिक्षणाला भविष्यात तितकेच महत्त्व येणार आहे. सामाजिक शास्त्रांच्या शिक्षणाची पुनर्रचना करायला हवी, असे मत त्यांनी मांडले. यावेळी उद्घाटक शरद पाटील व गजेंद्र ऐनापुरे यांनीही  सध्याच्या शिक्षणप्रणालीविषयी मत व्यक्त करताना त्यात योग्य बदलाची आवश्यकता मांडली. डॉ. राजेश फडकुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रावसाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या अधिवेशनात आर्यनंदी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात शाहीर कुंतिनाथ करके (कोल्हापूर), डॉ. वि. ल. धारूरकर (औरंगाबाद) व फुलचंद जैन (औरंगाबाद) यांना हे पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रत्येकी रोख ५००१ रुपये, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.