अमरावती महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असला तरी तिच्या चाव्या हस्तगत करण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला होणाऱ्या स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. यावेळी स्थायी समितीचे आठ सदस्य नव्याने निवडले जाणार आहेत आणि स्थायी समिती सभापतीपदाची खुर्चीही करारानुसार राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सोपवण्याचा सोपस्कार पार पडणार आहे.
काही दिवसांपूर्वी सोळा सदस्यीय स्थायी समितीतून आठ सदस्य ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून बाहेर पडले. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. यात संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाटय़ाला ३, राष्ट्रवादी २, शिवसेना, भाजप, जनविकास काँग्रेस-रिपाइं आघाडी प्रत्येकी एक, असा वाटा आहे. महापालिकेची आर्थिक धुरा सांभाळणाऱ्या स्थायी समितीत पोहोचण्यासाठी अनेक दिग्गजांनी मोर्चेबांधणी केली आहे, मात्र शेवटच्या क्षणीच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमधून माजी महापौर विलास इंगोले, डॉ. कांचन ग्रेसपुंजे, सुगनचंद गुप्ता, धीरज हिवसे, डॉ. दिव्या शिसोदे, आसिफ तवक्कल, अरुण जयस्वाल, योजना रेवस्कर यांची नावे आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीतून रीना नंदा, सुनील काळे, प्रवीण मेश्राम, सारिका महल्ले यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतून प्रवीण हरमकर यांना यावेळी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जनविकास काँग्रेस-रिपाइं आघाडीतर्फे अंजली पांडे यांचे नाव चर्चेत आहे. बसपतर्फे दीपमाला मोहोड, गोपाल गजभिए यांच्या नावाचा विचार सुरू आहे. बसपचे एक सदस्य २० तारखेला राजीनामा देऊन आणखी एका नव्या सदस्याला संधी देतील, असे सांगण्यात येत आहे. स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये विद्यमान सभापती चेतन पवार, बाळासाहेब भुयार, शीला बजाज, प्रदीप बाजड, अंबादास जावरे, अब्दूल रफिक, भूषण बन्सोड, नूर खाँ मोजदार खाँ यांचा समावेश आहे. स्थायी समितीत चार महिला सदस्य होत्या. त्यापैकी केवळ शीला बजाज यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना बाजूला व्हावे लागले.
सदस्यपदाची संख्या केवळ आठ असल्याने आणि प्रत्येक पक्षाजवळ मर्यादित जागा असल्याने वरिष्ठ नेत्यांसमोर सदस्य निवडीचे आव्हान आहे. सदस्यपदासाठी इच्छूकांची संख्या मोठी आहे. या पदांवर कुणाची वर्णी लागते, याची उत्सूकता महापालिका वर्तुळात आहे. सभापतीपदाची निवडणूक पुढील महिन्यात होणार असली त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. सत्तावाटपाच्या सुत्रानुसार स्थायी समितीचे सभापतीपद यावर्षी काँग्रेसला देण्याचे धोरण ठरवण्यात आले होते. उभय पक्षांमध्ये झालेल्या या अलिखित कराराचे पालन केले जाईल, असे संकेत मिळाले आहेत.
राष्ट्रवादीने सभापतीपदावरचा दावा सोडला आहे. आता या पदावर   काँग्रेसच्या  एखाद्या सदस्याची निवड केली जाईल, हे जवळपास स्पष्ट आहे. काँग्रेसची शहरातील   राजकारणाची    सुत्रे    आमदार रावसाहेब शेखावत यांच्या हाती असल्याने त्यांच्यासमोर   या पदासाठी दोन नावे पुढे आली आहेत.
रावसाहेब शेखावत यांचे अत्यंत निकटस्थ बबलू शेखावत यांनी यापूर्वी स्थायी समितीचे सभापतीपद भूषवले आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी महापौर विलास इंगोले यांना संधी दिली जाते की, हिंदी भाषिकांच्या आग्रहाखातर सुगणचंद गुप्ता यांची वर्णी लागते, याची उत्सुकता आहे.