थकीत कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतन मिळावे, म्हणून कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्षांचे निवासस्थान गाठले. परंतु दोन्ही ठिकाणी मागण्यांबाबत ठोस, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने वाद चिघळला. त्याचे पर्यवसान अध्यक्षांसह तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल होण्यात झाले.
शिरपूर कारखान्यास धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षी वित्त पुरवठा केला नाही. त्यामुळे गेल्या हंगामापासूनच म्हणजे तब्बल १८ महिन्यांपासून कारखाना बंद आहे. यामुळे साहजिकच कारखाना कामगारांवर उपासमारीची वेळ आली. यंदाही कारखाना सुरू होण्याची चिन्हे धूसर आहेत. कारखाना सुरू होणार की नाही, या शंकेने कामगारांनी थकीत वेतन मिळावे यासाठी कारखान्याचे उपाध्यक्ष बबन चौधरी यांचे निवासस्थान गाठले. प्राथमिक चर्चेनंतर चौधरींसह सर्वजण अध्यक्ष व्ही. यु. पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. मागण्यांचे निवेदन पाटील यांना देण्यात आले. पाटील यांच्याशी चर्चा सुरू असतानाच त्यांचा पुतण्या विलास भावराव पाटील तेथे आला. त्यांची आणि कामगार प्रतिनिधींची शाब्दिक चकमक झाली. वाद विकोपाला गेला. एकमेकांना धक्काबुक्की सुरू होताच पोलिसांना बोलविण्यात आले.
 पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी घटनास्थळी कुमक पाठविल्यानंतर संभाव्य स्थिती नियंत्रणात आली. अध्यक्ष पाटील यांच्या घरासमोरच बैठक घेवून या घटनेचा कामगार संघटनेने निषेध केला.
सफाई कामगार सुरेश थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्ही. यु. पाटील, त्यांचा मुलगा युवराज पाटील व पुतण्या विलास पाटील या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, कारखान्याचे उपाध्यक्ष बबन चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा अध्यक्ष पाटील यांच्याकडे दिला. त्यासाठी वैयक्तीक स्वरूपाची कारणे नमूद करण्यात आली आहेत.