शहर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीसाठा असूनही नळाला ८-१० दिवसांनी पाणी येते. शहर स्वच्छतेबाबत मनपा उदासीन असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी केला.
शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कॉलनीत चांगले रस्ते नसल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. घाणीचे साम्राज्य पसरल्याने रोगराईचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी भीती वाघमारे यांनी पत्रकात केली. मनपा प्रशासनाला स्वच्छता, पाणी आदींबाबत लेखी कळवूनही उपाययोजना होताना दिसत नाही. सध्या रमजानचा पवित्र महिना चालू आहे. अनेक भागात पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातूनच मार्ग काढावा लागतो. महापालिकेत उपायुक्त, सहायक आयुक्त, नगररचनाकार, विद्युत निरीक्षक व अभियंता आदी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबून राहात आहेत. राहटी बंधाऱ्यात मुबलक पाणी असतानाही परभणीकरांना पाणी मिळत नाही. चार विद्युत पंप असतानाही केवळ दोन पंपांवरच पाणीपुरवठा केला जातो. घरकुल योजनाही रेंगाळत आहे. मनपा प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना वाघमारे यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health problems in parbhani are increasing
First published on: 14-07-2013 at 01:54 IST