घराच्या खरेदीची नोंदणीची प्रक्रिया ‘ऑनलाइन’ झाली असली तरी अजूनही बाल्यावस्थेत असलेल्या या तंत्रामुळे राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये नोंदणीची प्रक्रिया काहीशा धीम्या गतीने चालू आहे. त्यामुळे, रजा काढून किंवा कामातून सवड काढून नोंदणीसाठी गेलेल्यांना कित्येकदा कामाशिवाय हात हलवत परत यावे लागते आहे.
ऑक्टोबर, २०१२पासून घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली. या अंतर्गत घर खरेदीशी संबंधित करारपत्र, स्टॅम्प डय़ुटी व नोंदणी (रजिस्ट्रेशन) विषयीच्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ती ऑनलाईन जमा करून घ्यावी लागत आहेत. कागदपत्रे वा फाईल सांभाळण्याच्या व्यापातून राज्यभरातील विभागीय जिल्हाधिकारी कार्यालयांची सुटका झाली आहे. मात्र, घरांच्या व्यवहारांशी संबंधित सर्व कागदपत्रे नव्या पद्धतीनुसार स्कॅन करावी लागतात. ऑनलाइन नोंदणीसाठीचा ‘सव्‍‌र्हर’ मात्र काही वेळा या किचकट कामात साथ देत नसल्याने तो वारंवार ‘हँग’ होतो, अशी नोंदणीदारांची तक्रार आहे. रजा काढून गेलेल्यांची मात्र यामुळे विनाकारण ससेहोलपट होते आहे.  नोंदणीसाठी गेलेल्यांनाही स्कॅनिंगसाठी बराच वेळ लागत असल्याने तासनतास जिल्हाधिकारी कार्यालयात बसून राहावे लागत आहे. दलालांमार्फत गेलेल्यांची ही अवस्था तर दलालांशिवाय गेलेल्यांचे काय असे वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीसाठी आलेल्या एकाने सांगितले.
या बाबत बोरिवलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दीपक पाटील यांना विचारले असता त्यांनी काही तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याच्या माहितीला दुजोरा दिला. मात्र, नवी व्यवस्था कार्यान्वित होऊन एखाद दुसरा महिना झाला आहे. एकदा का यातील तांत्रिक अडचणी लक्षात आल्या की त्या दूर करता येतील. लवकरच ऑनलाईन नोंदणी वेगाने करता येईल, अशी यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.