शासन अन् प्रशासन एकीकडे वारक ऱ्यांसाठी वारेमाप घोषणा करते, परंतु त्यातील सुविधा मात्र न देता क्रूर थट्टाच करते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कार्तिकी यात्रेकरिता चार ते पाच लाख वारकरी, भाविक, भक्त त्यांना स्वयंपाकासाठी रॉकेल मात्र गरजेपुरतेही उपलब्ध नसल्याने वारक ऱ्यांमधून कमालीची नाराजी पसरली आहे.
पंढरपुरात भरणाऱ्या चार यात्रांपैकी आषाढी व कार्तिकी यात्रा या मोठय़ा वाऱ्या असून येथे येणाऱ्या लाखो वारक ऱ्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्य निवास, अन् स्वयंपाकासाठी गॅस, केरोसिन पुरवण्याची जबाबदारी प्रशासन व शासनाची आहे. यातील कार्तिकी यात्रेकरिता केवळ ६० हजार लिटर रॉकेल उपलब्ध झाले आहे. तेही शेजारच्या जिल्ह्य़ातील मासिक कोटय़ातून एक टँकर कमी करून वारीची सोय केली आहे. यात्रेकरिता शहरात ५० ठिकाणी हातगाडय़ांमार्फत हॉकर्सतर्फे या रॉकेलविक्रीची सोय केली आहे. सध्या अशा एकेका गाडय़ावर रॉकेलसाठी दोनशे-तीनशे वारकरी रांगेत उभे आहेत. परंतु प्रत्यक्षात एका गाडय़ावर एक वारकऱ्यास १ लिटर रॉकेल जरी दिले तर त्यातून केवळ केवळ १३० वारक ऱ्यांची आणि अशारितीने ५० गाडय़ांवर ६०० ते १ हजार जणांनाच रॉकेल मिळणार आहे. या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मात्र ६ ते ७ सात लाखांच्या घरात आहे.
वारकऱ्यांना वारीतील सात दिवसांकरिता ९३५ रुपये देऊन गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. संस्था व वारीकरिता जे गॅस सिलेंडर उपलब्ध केले आहेत ते १२०४ रुपयास तर व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांच्या करता १६८८ रुपये दराचे गॅस सिलेंडर उपलब्ध केले आहे. हे दर वारकऱ्यांना परवडणारे नाहीत.
पंढरीत २२ ते २८ नोव्हेंबर दरम्यान लाखो वारकरी मुक्कामी असतात. यात्रा काळात प्रत्येकी दोन लिटरप्रमाणे वाटप करण्यासाठी किमान ३ लाख लिटर रॉकेल गरजेचे आहे. कारण सर्वच वारकरी गॅस सिलेंडरचा वापर करू शकत नाहीत. असे असताना ६० हजार लिटर रॉकेल कसे पुरणार हा खरा प्रश्न आहे.
वारकरी रॉकेलसाठी पायपीट करत आहेत. ‘चढय़ा भावाने पैसे घ्या. पण रॉकेल द्या’ असा सूर वारकरी मंडळीतून असून हे असे म्हणण्याची वेळ शासनामुळे आली आहे. सरकार नुसते वारक ऱ्याचे नाव घेऊन सुविधा देतो म्हणून सांगते परंतु प्रत्यक्षात देत नाही अशी चर्चा होत आहे.