केंद्र व राज्य सरकार यांनी मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी त्वरित हस्तांतरित करावी, अशी मागणी येथील अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली असून, या प्रक्रियेस विलंब होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
इंदू मिलमधील साडेबारा एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यात यावी, ही मागणी कित्येक दिवसांपासून आंबेडकरी जनतेकडून करण्यात येत आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही समितीच्या वतीने करण्यात आला आहे. सहा डिसेंबरपूर्वी केंद्र व राज्य सरकारने ही जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे. या वेळी अविनाश आहेर, राहुल तुपलोंढे, अ‍ॅड. अरुण दोंदे यांसह समितीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.