कर्जत तालुक्यातील उत्तर भागास वरदान ठरणाऱ्या सीना धरणात अखेर आज कुकडीचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळेल.  
तालुक्यात यंदा तीव्र दुष्काळी स्थिती आहे. मिरजगाव, निमगाव गांगर्डासह सतरा गावांच्या पिण्याचा पाणीपुरवठा सीना धरणातून होतो. शिवाय परिसरातील पाण्याचे टँकरही येथूनच भरले जातात.
सध्या धरण कोरडेठाक असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल.  सीना धरणात पाणी सोडावे म्हणून विविध पक्षांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना भेटले. दि. २३ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी नगर-सोलापूर रस्त्यावर मांदळी येथे रास्ता रोको आंदोलन केले. शिवाय पालकमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सीना धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज सकाळी सहा वाजता ९५ क्युसेकने सीना धरणात पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री व आमदार राम शिंदे यांचे मिरजगावचे सरपंच काशिश्वर बुद्धिवंत व उपसरपंच संपतराव बावडकर यांनी आभार मानले.