शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने सर्वसामान्य मराठी माणसाला अस्मिता देणारा आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवनाचे सोने करणारा महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय नेता हरपला, अशा शब्दात ठाकरे यांना मंगळवारी महापालिकेच्या सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महापालिका सभेत मंगळवारी सर्वपक्षीय चोवीस नगरसेवकांनी भाषणे करून ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. दिलीप बराटे, पृथ्वीराज सुतार, बाबू वागसकर, संजय भोसले, अभय छाजेड, मुकारी अलगुडे, दत्ता धनकवडे, पुष्पा कनोजिया, भरत चौधरी, धनंजय जाधव, रुपाली पाटील, युगंधरा चाकणकर, बाळा शेडगे, सुनंदा गडाळे, राजू पवार, संजय बालगुडे, प्रा. मेधा कुलकर्णी, बंडू केमसे, अश्विनी कदम, सचिन भगत, कल्पना थोरवे, अशोक हरणावळ आणि बाबुराव चांदेरे यांची यावेळी भाषणे झाली. सभापतिपदी वनिता वागसकर होत्या.
बाळासाहेबांच्या जाण्याने सारा महाराष्ट्र हळहळला हेच त्यांचे थोरपण होते. साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण अशा सर्वच प्रांतांमध्ये मोठी कामगिरी केलेला नेता हरपला आहे, असे बराटे म्हणाले. बाळासाहेबांचा स्नेह आणि सहवास आम्हाला लाभला हे आम्ही आमचे भाग्य मानतो. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आयुष्याचे सोने केले, अशी भावना सुतार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे, असे छाजेड म्हणाले.
बाळासाहेब उत्तम संघटक, उत्तम वक्ते, उत्तम मित्र आणि अजातशत्रू होते. त्यांनी मराठी माणसाला खऱ्या अर्थाने अस्मिता दिली, असे प्रा. कुलकर्णी म्हणाल्या. ठाकरे हे जातिभेदाच्या पलीकडे गेलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते, असे कनोजिया यांनी सांगितले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांला बाळासाहेबांनी ओळख दिली, असे शेडगे म्हणाले. बाळासाहेब हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणारे नेते होते, अशी भावना धनकवडे यांनी व्यक्त केली.
मी एक झोपडपट्टीतील सर्वसामान्य आणि रिक्षा चालवणारा कार्यकर्ता होतो. बाळासाहेबांचा स्पर्श मला झाला, त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली. माझ्यासारख्या शेकडो, हजारो सामान्य कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी ओळख मिळवून दिली, असे शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी सांगितले. बाळासाहेबांनी प्रथम देशहिताचा विचार केला आणि नंतर राज्याच्या हिताचा विचार केला. सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले, अशी भावना वनिता वागसकर यांनी व्यक्त केली. त्यानंतर श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्यात आली.
उद्या सर्वपक्षीय श्रद्धांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी दहा वाजता ही सभा होईल. पुण्याचे पालकमंत्री सचिन अहिर, तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह सर्वपक्षीय आमदार व पदाधिकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
‘सर्वसामान्य मराठी माणसाला अस्मिता देणारा नेता हरपला’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने सर्वसामान्य मराठी माणसाला अस्मिता देणारा आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवनाचे सोने करणारा महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय नेता हरपला, अशा शब्दात ठाकरे यांना मंगळवारी महापालिकेच्या सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
First published on: 21-11-2012 at 05:16 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leader has gone who gives a light to common marathi people