दरवेळी तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा भविष्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरीडॉर, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे अधिक पाणी लागण्याची गरज लक्षात घेऊन धुळ्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजनांची गरज असल्याचे मत आ. अनिल गोटे यांनी मांडले आहे.
धुळे शहराला पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता १९९४ मध्ये तापी नदीतून ५८-६० किलोमीटर लांब जलवाहिनी टाकून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. उन्हाळ्यातील तीन महिने नदीला पाणी राहात नसल्याने योजना बंदच राहात असे. या कालावधीत नकाणे व डेडरगाव तलावातून पाणी पुरवठा केला जातो. ३० वर्षांपासून नकाणे तलाव तुडुंब भरलाच नाही. २००१ व २००२ मध्ये सलग २९ दिवस शहराला या योजनेचे पाणीच मिळाले नाही. त्यावेळी आपल्या कल्पनेतून तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते एक कोटी २५ लाख रुपयाच्या एक्सप्रेस कालव्याचे उद्घाटन करण्यात आले. या कालव्यातून नकाणे तलावात पाणी आणण्यात आले. सलग दहा वर्ष याप्रकारे नकाणे तलावात पाणी आणण्यात येत होते. मध्यतंरी काही कारण नसताना हरणामाळ साठवण बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळेच पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. नैसर्गिक उतरंड नसल्यामुळे तीन मोठे तलाव भरल्यानंतर हरणामाळमध्ये पाणी येऊ शकते. या प्रकारात २०० दशलक्ष घनफूट पाणी वाया जाते. तर तीन तलावात ५० ते ६० दशलक्ष घनफूट साठा अकारण ठेवावा लागतो. दुसरीकडे पालिका आणि पाटबंधारे विभागाने एक्सप्रेस कालवा बंद केला. त्यामुळे एक्सप्रेस कालवा पुन्हा सुरु करुन नकाणे तलावात पाणी आणल्याशिवाय सध्या शहरापुढे इतर कोणताही पर्याय नसल्याचे आ. गोटे यांनी म्हटले आहे.
धुळे शहरासाठी पाणीसाठा करण्याकरिता अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून १५० क्युसेक्स पाणी सोडले जाते. परंतु हरणामाळ साठवण बंधाऱ्यात येईपर्यंत ते केवळ १८ ते २० क्यसेक्स इतकेच राहाते. २००१ मध्ये राबविण्यात आलेली योजना यंदा राबविण्याची गरज आहे. अन्यथा शहरात पाणीसमस्या गंभीर होईल. २००१ मध्ये पिंपळनेरजवळील पांझरा, मालणगाव व जामखेली या धरणांमधून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले. पांझरेतून सय्यदनगर बंधारा, तिथून कुंसुब्याजवळील नाला, नंतर चौगाव कालवा, तिथून वाघाड नाला व पुढे एक्सप्रेस कालव्यातून नकाणे तलावात पाणी आणण्यात आले. या पाण्यामुळे मे महिन्यात नकाणे तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. सद्यस्थितीत पांझरा, जामखेली, मालणगाव, काळाखडक या प्रकल्पांमध्ये एकूण २१९३ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पांतील एकूण १०६० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी ७०० दशलक्ष घनफूट पाणी तातडीने पांझरा नदीत सोडल्यास नकाणे तलावात ३५० दशलक्ष घनफूट पाणी साठवता येईल. तसेच नकाणे तलावात १६ ते १८ फूट गाळ साचल्यामुळे साठवणूक क्षमता कमी झाली आहे. या तलावाचा मालकी हक्क पालिकेकडे वर्ग करावा, डेडरगाव आणि नकाणे तलाव यांची उंची पाच मीटरने वाढवावी, या उपाययोजना करणे आवश्यक आहे. दोन्ही तलावांच्या उंचीवाढीसाठी २२ ते २५ कोटी रूपये खर्च येऊ शकेल. तसेच या उपाययोजनांसाठी विजेचा खर्चही नाही. या उपाययोजना राबविण्याकरिता केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान व धोरणात्मक निर्णय होण्याची गरज असल्याचे गोटे यांनी नमूद केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2012 रोजी प्रकाशित
धुळ्याच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपायांची गरज
दरवेळी तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा भविष्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरीडॉर, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे अधिक पाणी लागण्याची गरज लक्षात घेऊन धुळ्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजनांची गरज असल्याचे मत आ. अनिल गोटे यांनी मांडले आहे.

First published on: 10-11-2012 at 12:21 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life long solution should be there on water shortege problem