कात्रज तलावातील मासे मोठय़ा प्रमाणावर मृत झाल्याचे आढळल्यामुळे या भागात शुक्रवारी हा मोठा चर्चेचा विषय झाला. तलावात पसरत असलेली जलपर्णी आणि दूषित होत असलेले पाणी यामुळे मासे मृत झाले असावेत, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
कात्रज तलावातील अनेक मासे मृतावस्थेत आढळल्याचे लक्षात आल्यानंतर मासे कशामुळे मृत झाले असावेत, याबाबत या भागात चर्चा सुरू झाली. तलावातील पाणी सातत्याने दूषित होत आहे. तसेच तलावात जलपर्णी देखील मोठय़ा प्रमाणावर पसरली असल्यामुळे सूर्यकिरण थेट पाण्यात जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी मोठा पाऊस झाला की तलाव भरून वाहतो. त्यामुळे देखील त्या वाहत्या पाण्यातून तलावातील अनेक मासे नदीपर्यंत जातात. यंदा मात्र पाऊस कमी झाल्यामुळे तलाव भरून वाहिला नाही. तलावातील मासेमारीलाही यंदा बंदी करण्यात आली आहे आणि आधीच्या ठेकेदाराने माशांची संख्यात्मक वाढ होण्यासाठी पिले तलावात आधीच सोडून ठेवली होती. त्यामुळे तलावातील माशांची संख्या वाढली असली, तरी पाणी मात्र दूषित असल्याने मासे मृत होण्याचे ते एक कारण असावे, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
मासे मृत झाल्यामुळे तातडीची बाब म्हणून ठेकेदाराला मासे पकडण्यासाठी परवानगी देण्यात आली असून हे काम शनिवारपासून सुरू होईल. तसेच तलावातील जलपर्णी काढण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावण्यात आले आहे. पाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीनेही उपाययोजना केल्या जात असून हे कामही शनिवारपासून सुरू होईल, असे सांगण्यात आले.