विटभट्टीसाठी लागणारी राख घेऊन परतणाऱ्या बुलढाणा येथील ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नळगंगा नदीपात्रात तांदुळवाडी पुलावरून १०० फूट खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ४ जण ठार व १ जण गंभीर जखमी, तर २ जणांना किरकोळ जखमा झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजता घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुलढाणा येथील ट्रक (क्र. एमएच ०४/ सी/५१६२) हा जळगाव जिल्ह्य़ातील वरणगाव येथून विटभट्टीसाठी लागणारी राख घेऊन सकाळी बुलढाणाकडे निघाला. दुपारी १२.३० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील तांदुळवाडी पुलावरून हा ट्रक नळगंगा नदीपात्रात १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात साहेबराव प्रल्हाद चव्हाण (४०) हा जागेवरच ठार झाला, तर ट्रकचालक शे. सलीम शे.खलील (४५), अर्जून उखा राठोड (२३), राजेश बाबुराव चव्हाण, गोपीचंद राजाराम चव्हाण (२३, सर्व मोहेगाव ता. मोताळा) या चार जखमींना उपचारासाठी जळगाव खांदेश येथे नेत असतांना ते वाटेतच मरण पावले. पूलावरून ट्रक कोसळत असल्याचे लक्षात येताच रोहीदास हरदास राठोड (२४), देविदास शिवदास पवार (२६) या दोघांनी ट्रकमधून उडय़ा टाकल्या. यातील एक जण पूलावर, तर दुसरा पूलाच्या कठडय़ाखाली पाईपाला लटकल्याने या दोघांना थोडे फार खरचटले, मात्र त्यांचा जीव सुदैवाने वाचला.  अपघात घडताच तांदुळवाडी येथील पोलीस पाटील, श्रीकृष्ण बोरले, रवींद्र भारसाकळे, संतोष कांडेलकर, हरी बोंडे, नामदेव राणे यांनी जखमींना ट्रकमधून काढण्यास पोलीस निरीक्षक बरडेकर, गिते, शिराळे, सोनोने, राऊत, वाहतूक पोलिसांनी सहकार्य केले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या त्या जीवघेण्या पुलाने आजपर्यंत अनेक जीव घेतले असून त्या पुलाबद्दल पोलीस निरीक्षक दिनेश बरडेकर यांनी संबंधित अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. या अगोदरही पत्र पाठवून पूलावरील खड्डे बुजविणे व कठडेही न केल्याने आज संबंधित अधिकाऱ्यांना पुलाची दुरुस्ती लवकर न केल्यास तुमच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी दिली.