आतापर्यंत १७ हजारहून अधिक तंटय़ांची सोडवणूक
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील सतरावा लेख.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत विविध स्वरूपाचे एकूण ३८,९९६ तंटे दाखल झाले असून ,त्यापैकी १७, २०६ तंटे सामोपचाराने मिटविण्यात यश मिळाले आहे. नाशिक जिल्ह्याचे सहभागित्वाचे प्रमाण काहीसे घसरले असले तरी तंटे मिटविण्याच्या कामात मात्र आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तंटे मिटविण्याचे हे प्रमाण ४५ टक्क्यांच्या जवळपास आहे.
स्थायी व समतोल विकास साधण्यासाठी गावात सामाजिक शांतता व सुरक्षितता असणे आवश्यक आहे. कारण, असे वातावरण नसल्यास कोणीही विकास साधू शकत नाही. या पाश्र्वभूमीवर, शासनाने गावातील तंटे गाव पातळीवर मिटविले जावेत आणि गाव पातळीवर नव्याने तंटे निर्माण होवू नयेत, या उद्देशाने या मोहिमेची संकल्पना मांडली आहे. तंटे मिटविण्याची मुख्य जबाबदारी तंटामुक्त गाव समितीवर सोपविण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला तंटामुक्त गाव समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. नाशिक जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ९३९ तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तंटे मिटविण्याच्या कामात ही समिती मध्यस्ताची भूमिका बजावते. ग्रामस्थांना मार्गदर्शन करून या मोहिमेत सहभागी करणे, तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे, नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे याची धुरा समितीकडे सोपविण्यात आली आहे. या प्रक्रियेत समितीला गरजेनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा आणि कायदेतज्ज्ञ यांची मदत घेता येते.
२०११-१२ हे या मोहिमेचे सहावे वर्ष. या वर्षांत जानेवारी २०१३ अखेपर्यंत तंटे मिटविण्याच्या कामात नाशिकने चांगलीच आघाडी घेतल्याचे लक्षात येते. आतापर्यंत जिल्ह्यात दिवाणी स्वरूपाचे ४५३३, महसुली १०२९, फौजदारी ३३४३४ असे एकूण ३८,९९६ तंटे दाखल झाले आहेत. त्यातील दिवाणी स्वरूपाचे ४४४, महसुली स्वरूपाचे ३७८ आणि फौजदारी स्वरूपाचे १६३८४ असे एकूण १७,२०६ तंटे सामोपचाराने मिटविण्यात यश मिळाले.
तंटय़ांची एकूण संख्या आणि मिटलेल्या तंटय़ांचे प्रमाण लक्षात घेतल्यास अजून २१,७९० तंटे प्रलंबित असल्याचे लक्षात येते. इतर गटातील एकही तंटा अद्याप दाखल नसल्याने त्याचे निराकरण करण्याची समित्यांना आवश्यकता भासली नसल्याचे नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या अहवालावरून दिसून येते. समितीच्या सदस्यांनी तंटे मिटविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित होय. समितीच्या सदस्यांनी तंटे मिटविण्याच्या कामात रस घेतल्यास या योजनेचा मूळ उद्देशही साध्य होवू शकतो.
शासनाने देखील समितीची रचना करताना सर्व घटकांना त्यात प्राधान्य राहील याची दक्षता घेतली. जेणेकरून समितीचे कामकाज निरपेक्ष व नि:पक्षपातीपणे होईल, याकडे लक्ष देण्यात आले. सदस्यांनी समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे, समितीच्या कामासाठी वेळ देणे व तंटे मिटविण्याच्या कामात रस घेणे आवश्यक असते. तंटे मिटविताना त्यांच्या दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. तंटे मिटविताना सदस्यांचा नकारात्मक अथवा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन असू नये, असेही समिती सदस्यांसाठीच्या आचारसंहितेत शासनाने म्हटले आहे.
तंटे मिटविण्याच्या कामात नाशिक जिल्ह्यातील समित्यांनी पकडलेला हा वेग पुढील काळात कायम राखल्यास उत्तर महाराष्ट्रात नाशिक तंटे सोडविण्यात अग्रेसर राहील, हे निश्चित.
ल्ल अनिकेत साठे
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2013 रोजी प्रकाशित
तंटे मिटविण्यात नाशिक आघाडीवर
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील सतरावा लेख.
First published on: 23-02-2013 at 04:35 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik is at top at sloveing the quarrel