गेल्या शनिवारी गोविंदगावनजीक झालेल्या चकमकीच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी येत्या ३० जानेवारीला गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले होते. पोलिसांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी या जिल्ह्य़ातील सामान्य जनतेने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम विभागीय समितीचा प्रवक्ता श्रीनिवासने एका पत्रकातून केले आहे. ठार झालेले सहाही नक्षलवादी जनतेसाठी लढणारे होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा बंद आयोजित करण्यात आल्याचे या पत्रकात नमूद केले आहे. देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी सुशिलकुमार शिंदे यांनी सांभाळल्यापासून गडचिरोलीतील पोलिसांच्या दमनसत्रात वाढ झाल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. या बंदमधून रस्त्यावरून फिरणाऱ्या रुग्णवाहिकांना वगळण्यात येत असल्याचे नक्षलवाद्यांनी प्रथमच या पत्रकातून जाहीर केले आहे.