वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात पूर्ण अपयशी ठरलेल्या नांदेड पोलीस दलातील काही ‘रझाकारी’ अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी तरोडा नाका भागात ऑटोचालक व सामान्य वाहनचालकांवर मारहाणीचे ‘अस्त्र’ उपसले. पोलिसांच्या या दहशतीने काही किरकोळ अपघात घडल्याने तिघांना दुखापत झाली.
शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. अरुंद रस्ते, जागोजागी अतिक्रमण, वाहनांची भरमसाठ संख्या यामुळे वाहतूक विस्कळीत होत असली, तरी पोलिसांची निष्क्रियताही त्याला तेवढीच कारणीभूत आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी वारंवार देत असले, तरी कनिष्ठ अधिकारी किंवा वाहतूक शाखेचे कर्मचारी तो जुमानत नाहीत. वाहतुकीबाबत तक्रारी वाढल्यानंतर जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी या प्रकरणात पोलिसांना तंबी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली मंगळवारी पोलिसांनी तरोडा नाका भागात अनेकांना मारहाण केली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा शीघ्र कृती दलाच्या जवानांची मदत घेतली जाते. पोलिसांनी मात्र या दलाचा वाहनचालकांना मारहाण करण्यासाठी वापर केला. तरोडा नाका भागात दुपारी पोलीस उपअधीक्षक मोरे यांच्या समक्ष वाहनचालकांनाही मारहाण सुरू होती. कागदपत्रांची विचारणा केल्यानंतर संबंधित चालक कागदपत्र दाखवेपर्यंत त्यांच्या अंगावर पोलिसांच्या दोन-तीन काठय़ा पडत होत्या.
अर्वाच्च शिवीगाळ व मारहाण असा अनुभव आल्यानंतर हा प्रकार पाहणाऱ्या अनेकांनी ‘ही रझाकारी आहे काय?’ असा उद्विग्न सवाल केला. एका ऑटोचालकाने ‘साहेब तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला का त्रास देता,’ अशी विचारणा करण्याचे धाडसही केले. पण पोलिसांनी त्याला पिटाळले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आज काही वाहनचालकांवर कारवाई झाली पण अनेकांना काठय़ांचा प्रसाद मिळाला.
उल्लेखनीय म्हणजे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असताना पोलीस अधिकारी तरोडा नाका, भावसार चौक, कौठा, सांगवी या वर्दळ नसलेल्या ठिकाणी वाहतूक सुधारण्याचे प्रयत्न करीत आहेत. पोलिसांचा हा प्रकार म्हणजे ‘आजार म्हशीला व उपचार पखालीला’ असा मानला जातो. नांदेड शहरात गेल्या काही दिवसात अनेक गंभीर गुन्ह्य़ांची नोंद झाली. बॅग चोरीच्या तीन घटनात २५ लाखांची रोकड पळविण्यात आली. या तिन्ही प्रकरणांचा तपास ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. केवळ गुन्हा दाखल करायचा आणि ‘तपास सुरू आहे’ एवढेच उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकायची अशी मानसिकता वाढत चालली आहे.
अन्य विभागांच्या कामात रुची
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारांवर अंकुश मिळवणे, सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणे हे मुख्य काम सोडून पोलीस दलातील काही अधिकारी गुटख्याची कुठे विक्री सुरू आहे का, स्वस्तधान्य दुकानातले धान्य गोदामाबाहेर पडले का, कोणत्या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत दारू विकली जाते, याकडेच विशेष लक्ष ठेवून आहेत. अन्न व औषध प्रशासन, पुरवठा विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असलेली कामे करण्यात पोलिसांनी रुची दाखवण्यापेक्षा गुन्हेगारांवर आपली जरब बसवावी, अशी प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली.