पंधरा दिवसांपासून सुरूअसलेला प्रचाराचा धडाका सायंकाळी संपल्यानंतर मतदानापूर्वीचे महत्त्वाचे दोन दिवस ‘मतदान व्यवस्थापना’चे राहणार असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे ‘पोल मॅनेजर्स’ कामाला लागले आहेत. 

विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, आम आदमी पक्ष या प्रमुख पक्षांसह इतरही काही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. आचारसंहिता, निवडणूक निरीक्षकांची नजर या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी गेली पंधरा दिवसात प्रचार यंत्रणा राबविली. मिरवणुका, प्रचार सभा, पदयात्रा आदींवर उमेदवारांचा भर होता. उमेदवाराची सभा कुठे घ्यायची, कुठल्या भागात मिरवणूक घ्यायची, कुठल्या भागात पदयात्रा काढायची याबाबतचे निर्णय एका खोलीत बसून ‘पोल मॅनेजर्स’ घेत असत. उमेदवाराला दिवसभरात कुठे फिरायचे आहे आणि कुठल्या जाहीर सभेत भाषण करायचे आहे याची यादी सकाळी सोपवली जात असे. सर्वच पक्षात अशीच पद्धत रुढ झाली आहे.
जाहीर प्रचार थांबल्यानंतर ‘पोल मॅनेजर्स’च्या भूमिकेत बदल होतो. उघड प्रचार थांबल्यानंतरच्या प्रचारासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी असल्याने त्यांनी त्यांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शहरात वॉर्डनिहाय तर ग्रामीण भागात प्रत्येक गावनिहाय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मतदारांची यादी, बुथनिहाय मतदार, बुथवर कार्यकर्त्यांची नियुक्ती या पारंपरिक कामांपेक्षाही मतदारसंघातील जातीनिहाय मतदार यादी पाहून कोणाचा कुठे प्रभाव आहे? संबंधित नेता कुणासोबत आहे? नाराज असेल तर त्याला वळविण्यासाठी काय करता येईल? झोपडपट्टय़ांवर कोणत्या नेत्यांचा प्रभाव आहे? कुठल्या भागात कोणत्या पक्षाची किती मते आहेत? पक्षाचे ‘प्लस पॉईन्ट’, ‘मायनस पॉईन्ट’ तपासणे, कमी प्रभाव असलेल्या भागात मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी काय करायचे, त्याची जबाबदारी कुणावर सोपवायची, आदींचे नियोजन सुरू झाले आहे.
विविध संस्था, संघटनांनी विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असला तरी संबंधितांना वैयक्तिक बोलून प्रत्यक्ष मतदान आपल्याच उमेदवाराच्या बाजूने कसे करता येईल, याची गणिते आखणे सुरू झाले आहे. अशांची नावे शोधणे, त्यांना गाठणे, त्याची समजूत घालणे, त्याचे मन वळविणे आदी जबाबदाऱ्या कुणावर सोपवायच्या, याचे आराखडे ‘पोल मॅनेजर्स’ बांधू लागले आहेत.
नागपूर जिल्ह्य़ात १४४ कलम लागू
नागपूर जिल्ह्य़ात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक खुल्या, निर्भय, शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता बिघडू नये म्हणून मतदान केंद्राच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या १४४ कलमाचे आदेश जिल्हा दंडाधिकरी अभिषेक कृष्णा यांनी पारित केले. जिल्ह्य़ातील कोणत्याही व्यक्तीस येत्या १० एप्रिलला म्हणजेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक व खासगी जागेत मते मिळवण्यासाठी प्रचार करता येणार नाही, मताची अभियाचना करता येणार नाही. कोणत्याही विशिष्ट उमेदवारास मत न देण्याबद्दल मतदाराचे मत वळवता येणार नाही. निवडणुकीशी संबंधित कोणतीही सूचना, खूण प्रदर्शित करता येणार नाही, मतदान केंद्रात किंवा त्याच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच आसपासच्या परिसरात ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. मतदान केंद्रापासून १०० मीटर त्रिजेच्या परिसरात निवडणुकीच्या कामानिमित्त शासकीय वाहन वगळता इतर कोणतेही वाहन आणता येणार नाही. मतदारांना ने-आण करण्यासाठी अनधिकृतपणे वाहनाचा वापर करता येणार नाही. मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतराच्या परिसरात मंडप उभारण्यास तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना बसण्याासाठी टेबल व खुच्र्या लावण्यास या आदेशाद्वारे मनाई आहे. हा आदेश १० एप्रिलला रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. याशिवाय नागपूर जिल्ह्य़ात १५ एप्रिलपर्यंत अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रवीण महाजन यांनी एका आदेशाद्वारे ३७ (१) कलम लागू केले आहे. हे कलम १५ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील.