राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा शाखेच्या वतीने खासगी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
शासनाने शिक्षण, अधिकार अधिनियम २००९ नुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुक्त करावा, खासगी प्राथमिक शाळांचे वेतनेतर अनुदान विनाअट देण्यात यावे, शाळा तेथे लिपीक, सेवक मान्य करावेत, खासगी शाळांना जोडून चालणाऱ्या बालवाडी व बालताई यांना अंगणवाडीताईप्रमाणे मानधन लागू करावे, २४ वर्षांची निवडश्रेणी विनाअट द्यावी, शाळांच्या भौतिक सुविधेसाठी जि. प. शाळेप्रमाणे खासगी शाळांना अनुदान देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  शारदा महाविद्यालयातून प्रारंभ झालेल्या या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बी. एम. सूर्यवंशी यांनी केले.