प्राणी, पक्षी, वनस्पती, मानव यांच्यासह या पृथ्वीतलावर वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक सजिवाला जगण्यासाठी आवश्यक घटकापैकी एक म्हणजे पाणी, परंतु हेच पाणी जनमानसांसाठी विष बनत असेल तर याला काय म्हणावे? बुलढाणा जिल्ह्य़ातील खारपाणपट्टय़ातील पाणी पिल्यामुळे ७४ जणांचा मृत्यू झाला, तर हजारो नागरिक व्याधीग्रस्त झाले आहेत. हा आकडा २०११-१२ या वर्षांतील आहे, तर २०१३ मध्येही अनेकांना या क्षारयुक्त पाण्याचा फटका बसला आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने हा प्रश्न सोडविलेला नाही.
 जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील काही भाग हा खारपाणपट्टा आहे. या भागात विशेष करून ग्रामीण भागातील नागरिक या दूषित पाण्यामुळे आजारी पडतात. काही बोटावर मोजण्याएवढे आर्थिकदृष्टय़ा समृध्द असलेले लोक आपल्या घरात आर.ओ. बसवून घेतात. मात्र, सर्व सामान्य लोकांचे काय? या भागात आदिवासी लोकांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात आहे. जवळपास हे सर्वच आदिवासी लोक दारिद्रय़रेषेखालील जीवन जगतात. त्यांना पाण्यासाठी आर.ओ. बसवणे शक्य नसल्याने नाईलाजास्तव त्यांना क्षारयुक्त पाणीच प्यावे लागते. या लोकांच्या जीवनावश्यक व आरोग्याशी निगडीत असलेल्या या प्रश्नाबाबत शासन, लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचेच दिसून येत आहे. क्षारयुक्त पाण्यापासून होणाऱ्या आजारांना दूर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने येथील समाजसेवकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. या भागातील लोकांना शुध्द पाणी उपलब्ध करून देण्याबाबतच्या शासकीय योजना केवळ कागदोपत्रीच दिसून येतात. नुकतीच आमदार कुटे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या जळगाव जामोद तालुक्यातील १२५ गावांना २०० कोटी रुपये लागत असलेले पाणी जलपूर्ती योजनेचा प्रस्ताव सरकारी फाईलांमध्येच अडकलेला आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास या भागातील क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न मार्गी लागून शुध्द पाणी मिळणार, यात शंका नाही. मात्र, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salty water killed 74 in two years
First published on: 01-01-2014 at 08:39 IST