अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या सवाई एकांकिका स्पर्धेत सलग तीन वर्षे ‘सवाई लेखक’ पारितोषिक मिळवणारे नाटककार संजय पवार पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर येणार आहेत. संजय पवार यांचे व्यावसायिक रंगभूमीवरील पहिले पाऊल हे लेखक आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत असेल. निर्माता राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर हे दोघे निर्मिती करत असलेल्या या नाटकाचे नाव आहे ‘ठष्ट’! ‘ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट’ असा या नाटकाचा विषय असून त्यातील आद्य आणि अंत्य अक्षर घेऊन नाटकाचे नाव ठरवण्यात आल्याचे लेखक व दिग्दर्शक संजय पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
लग्न हा मुलीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण असतो. मात्र हेच ठरलेले लग्न मोडल्यानंतर अजूनही समाजात मुलीलाच दोष दिला जातो. अनेकदा अशा मुलींचे लग्न ठरणेही मुश्कील होते. अशा मुलींची मानसिक स्थिती या नाटकात पकडण्याचा प्रयत्न आपण केल्याचे संजय पवार यांनी सांगितले. हा विषय आपल्या डोक्यात गेली पाच-सहा वर्षे घोळत होता. त्यामुळे याचे दिग्दर्शनही आपणच करावे, असे आपण ठरवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांमध्ये समांतर आणि व्यावसायिक नाटकांमध्ये सीमारेषा उरलेली नाही. मात्र तरीही वेगळ्या विषयाच्या नाटकाची निर्मिती करण्यासाठी तेवढेच धाडसी निर्माते मिळणे आवश्यक असते. सुदैवाने राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर या दोघांनीही आपल्याला संपूर्ण सहकार्य करत नाटकाच्या निर्मितीचे धनुष्य पेलल्याचे पवार म्हणाले. या नाटकात सहा मुली असून त्यातील चौघी प्रमुख भूमिकेत, तर दोघी साहाय्यक भूमिकेत असतील. रेश्मा रामचंद्र, अक्षया भिंगार्डे, सुपर्णा श्याम, आशा ज्ञाते, पूजा गायकवाड आणि हेमांगी कवी या सहा जणी ‘ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट’ सांगतील. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २८ एप्रिलदरम्यान होईल.