कुकडीमधून चौंडी बंधाऱ्याला लवकरच पाणी सोडू व आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत जलसंपदा खात्याकडे प्रस्ताव पाठवू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री दीड वाजता सांगितल्यानंतर आमदार राम शिंदे यांनी त्यांच्या दालनात दुपारी १ वाजता सुरू केलेले ठिय्या आंदोलन संपवले. प्रस्तावाची लेखी प्रत त्यांनी आज सकाळी शिंदे यांच्याकडे दिली.
शिंदे यांनीच आज दुपारी पत्रकारांना ही माहिती दिली. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यामुळेच जामखेडकरांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे या आरोपाचा त्यांनी पुनरूच्चार केला व त्याबाबतीत आपण ठाम आहोत, असे सांगितले. त्यांनी तोंडी आदेश दिले व नंतर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचा आदेश डावलून पाणी सोडण्याची प्रक्रिया थांबवली, असे ते म्हणाले.
जिल्हा प्रशासनाचा आदेश असतानाही पाणी का सोडले नाही या शिंदे यांच्या प्रश्नाला पाटबंधारे खात्याच्या श्रीगोंदे व कर्जत येथील अभियंत्यांकडून उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे शिंदे यांनी आत्मदहनाचा इशारा देत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाजवले. दुपारी १ वाजता त्यांचा प्रयत्न फसल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव त्यांना स्थिती समजावून सांगत होते, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सायंकाळी व नंतर तर रात्रीही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.
परगावी गेलेले जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार रात्री १ वाजता आले. माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी जिल्हाधिकारी व शिंदे यांची चर्चा घडवून आणली. संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावीत करण्याबाबत जलसंपदा विभागाला कळवू, तसेच चौंडी बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडू, असे आश्वासन मिळाल्यावर शिंदे यांनी रात्री दीड वाजता आंदोलन संपवले. पाणी मात्र अद्याप सोडलेले नाही. मात्र त्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे, अशी माहिती शिंदे यांनी पत्रकारांना दिली. जामखेडचे सरपंच कैलास माने, तालुकाध्यक्ष सूर्यकांत मोरे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, डॉ. गणेश जगताप, पांडुरंग उबाळे, अनिल यादव, डॉ. अल्ताफ शेख, नगरचे कार्यालयीन चिटणीस बाळासाहेब पोटघन यावेळी उपस्थित होते.