जळगाव शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर धरणातील जलसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याच्या पाश्र्वभूमीवर, औद्यगिक वसाहतीकडून आता शहराला पाणी पुरवठा करून टंचाईची ही तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव जिल्हयात यंदा पावसाचे प्रमाण जेमतेम ५० टक्के राहिले होते. शहरासह जामनेर व तालुक्यातील अन्य गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही फारसा पाऊस न झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणातील जलसाठा केवळ ४ टक्के होता. पावसाळा संपला पण पाऊस पडला नाही. मात्र, धरणातून पाण्याचा उपसा सुरूच होता. त्यामुळे धरणाच्या उपयुक्त पाणी साठय़ाचा पूर्णपणे वापर झाला व आता मृतसाठा वापरला जात आहे. या स्थितीत जळगाव शहराला दिवाळी नंतर दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. नोव्हेंबर मध्येच अशी टंचाई असल्याने जानेवारी ते जूनपर्यंत काय होणार, पाण्याच्या टंचाईची तीव्रता किती वाढणार या चिंतेत जळगांवकर होते. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहराच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी औद्योगिक वसाहतीकडून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. उद्योग मंत्रालयाने या मागणीला मान्यता दिली असल्याने शहराला दररोज १० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.
जळगाव शहरास वसाहतीचे पाणी मिळाल्यास टंचाईची तीव्रता कमी होणार हे निश्चित असून गिरणा धरणातूनही पाणी मिळवण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे अभियंत्याकडून सांगण्यात आले आहे.