ऊसाला भाव मागणे काही गुन्हा नाही. मात्र, गोळय़ा घालणे गुन्हा आहे. शेतकऱ्यांना गोळय़ा घालणारे राज्यातील सरकार उलथवून टाकल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला. सरकारने चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
केज मधील भाजप नेत्या प्रा. संगीता ठोंबरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. भाजप जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख, माजी आमदार पाशा पटेल, गंगाभीषण थावरे, संतोष हंगे, रमाकांत मुंडे आदी उपस्थित होते. या वेळी मुंडे म्हणाले, की देशात सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना उसाच्या भावासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार गोळय़ा चालवत आहे. शेतकऱ्यांनी उसाला भाव मागून काय गुन्हा केला? शेतकऱ्यांनी उसाच्या भावासाठी आंदोलन केले. ते आंदोलन चर्चेने सोडवता आले असते. सरकारने चर्चा करून मार्ग काढला पाहजे. मात्र, आडमुठेपणाची भूमिका घेत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.
या आंदोलनात सरकारच्या गोळीने बळी पडलेल्या कुटुंबीयांची आपण भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. आघाडी सरकार साखरसम्राटांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांना गोळय़ा घालत आहे, असा आरोप करून सरकारने दुष्काळात पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आदी प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.