एका भेटीत, एका शब्दात, एका नजरेत, एका जागेवर बसून सगळा महाराष्ट्र हलवण्याची ताकद बाळासाहेबांत होती. जिवाला जीव देणारे लाखो शिवसैनिक तयार करणे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक थोर व्यक्तीमत्व लयाला गेले, अशा शब्दांत पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
शहर शिवसेनेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित या शोकसभेला सर्वपक्षीय उपस्थिती होती. शिवसैनिकांना तर भावना आवरणे कठीण जात होतेच, पण अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही बाळासाहेबांबाबत काय बोलू आणि काय नको असे झाले होते. खासदार दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अनिल राठोड, शिवाजी कर्डिले, विजय औटी, राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी आमदार दादा कळमकर, राजीव राजळे, राष्ट्रवादीचे घनशाम शेलार, काँग्रेसचे विनायक देशमुख, उबेद शेख, भास्करराव डिक्कर आदी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी ठाकरे यांच्या काही आठवणी सांगत श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातही शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती.
पाच दशके घोंगावणारे वादळ शांत झाले, मराठी माणसांसाठी सगळे आयुष्य भांडणारा नेता गेला, महाराष्ट्र पोरका झाला, सामान्यातील सामान्यांना सत्तेवर आणणाऱ्या महान माणसाला महाराष्ट्र मुकला, दरारा, धाक असणारा, पटेल तेच बोलणारा व बोलेल तेच करणारा शब्दाचा पक्का माणूस गेला अशा विविध विशेषणांनी वक्तयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राठोड यांनी आठवणी सांगितल्या. गांधी यांनी सांगितले की केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांच्या आशीर्वादासाठी गेल्यावर त्यांनी पाठीवर हात ठेवत मोठी संधी मिळाली आहे, तिचे सोने करा असा आशीर्वाद साहेबांनी दिला. पाचपुते यांनीही ते गृहमंत्री असताना थेट मातोश्रीवर साहेबांनी कसे बोलावले व कौतूक केले त्याची आठवण सांगितली.
ब्रम्हवृदांने सामूहिकपणे म्हटलेल्या शांतीपाठाने सभेला सुरूवात झाली. व्यासपीठावर पाश्र्वभूमीवर बाळासाहेबांचा मोठा फलक लावलेला होता, तसेच त्यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती. पुष्पांजली अर्पण करून सभेला सुरूवात झाली. महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. विविध राजकीय पक्षांच्या वतीनेही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जनता दलाचे नाथमाधव शिंदे, भाकपचे सुधीर टोकेकर, काँग्रेसचे उबेद शेख, डी. एम. कांबळे, राष्ट्रवादीचे दादा कळमकर, शंकरराव घुले, घनशाम शेलार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सर्वश्री सुरेश महाराज, जंगले महाराज, शामभूषण राठोड, बिशप प्रदीप कांबळे, वारकरी सेवा संघाचे विठ्ठलशेठ बाफना, आंधळे महाराज, सिंधी समाजाच्या वतीने माजी नगरसेवक दामूशेठ बठेजा, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बाबासाहेब तांबे, हर्षदा काकडे, जिल्हा पत्रकार संघाचे सुभाष गुंदेचा, माजी मंत्री बाबासाहेब भारस्कर, व्यापारी संघटनेचे संतोष बोरा, जिल्हा परिषद सदस्य सत्यजीत तांबे, संपतराव म्हस्के, शिवसैनिक अंबादास पंधाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर दीपक सूळ, राजेंद्र दळवी, सतीश धाडगे, मधुसुदन मुळे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. राजेंद्र टाक यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.     
सभेचा औचित्यभंग
सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे शोकसभेला उपस्थित नव्हते. त्यांच्याविषयी चौकशी केली असता ते अस्थीकलश आणण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. काही वक्तयांनी शिवसेनेतील गटबाजीचा जाहीर उल्लेख करत, काहींनी राठोड यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलून, तर आणखी काहींनी राठोड, गांधी यांच्या पूर्वीच्या व्यवसायांबाबत शेरे मारत सभेचा विनाकारण औचित्यभंग केला. उपस्थितांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली.  
‘वाडिया पार्क येथे पुतळा उभारावा’
शिक्षण मंडळाचे सभापती सतीश धाडगे यांनी गांधीनगर, बोल्हेगाव येथील मनपा शिक्षण मंडळाच्या शाळेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव शिक्षण मंडळात मंजूर केला असल्याचे सांगितले. खासदार गांधी यांनी पाईपलाईन रस्त्याला त्यांचे नाव द्यावे अशी सूचना केली. काही वक्तयांनी बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा वाडिया पार्क येथे बसवावा अशी मागणी केली. शहरात साहेबांचे एखादे तरी मोठे, भव्य स्मारक असावे अशी इच्छा काहींनी व्यक्त केली.