पहाटेच्या बोचऱ्या थंडीत हजारो नागरिकांच्या प्रयत्नाने पंचगंगा नदीचा अवघा परिसर उजळून निघाला. निमित्त होते त्रिपुरा पौर्णिमेचे. सुमारे ५० हजार पणत्या प्रज्वलित झाल्याने पंचगंगा घाटाचे सौंदर्य खुलले होते.
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाट, मंदिराचे कठडे, पिकनिक सेंटर या भागांमध्ये पहाटेच्या पणत्या प्रज्वलित केल्या जातात. या उपक्रमास नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. यंदा ३ हजारांवर नागरिकांनी ५० हजारांवर पणत्या प्रज्वलित केल्या. मूळचेच सौंदर्य असलेल्या नदी घाटाच्या परिसराला नवचैतन्याचे लावण्य लाभले गेले.
विशेष म्हणजे केवळ पणत्या प्रज्वलित करून नागरिक थांबले नाहीत, तर या उपक्रमाला सामाजिक आशयाची जोड दिली गेली. या भागात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यामध्ये सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली, अजमल कसाबला दिलेली फाशी, स्त्रीभ्रूण हत्या या रांगोळ्या लक्षवेधी ठरल्या होत्या. यावेळी आतषबाजीही करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन पंचगंगा विहार मंडळ, शिवमुद्रा फ्रेंडस् सर्कल, सामाजिक संस्था, नागरिक यांच्या वतीने करण्यात आले होते.