आगरी समाजातील कुणा एकाचे लग्न म्हटले की हळदीचा कार्यक्रम ठरलेला. लग्नापेक्षा हळद मोठी या न्यायाने मग मटण-रश्शाचा बेत, ड्रम भरून मद्याचा पूर आणि डिजेचा ढणढणाटात पैशाचा दौलतजादा. शेतकरी, कष्टकरी आणि पंढरीच्या वाटेवर लीन होणारा माळकरी म्हणून ओळखला जाणाऱ्या आगरी समाजात लग्न समारंभात होणाऱ्या वारेमाप खर्चाला आवर बसावा यासाठी याच समाजातील काही ज्येष्ठ विचारवंत मंडळी सरसावली आहेत. विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होणारे तसेच वारकरी संप्रदायाला आपलेसे करणारे आगरी समाजातील कीर्तनकार, प्रवचनकारांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
शेतकरी, कष्टकरी वर्गातील आगरी समाजाने आपल्या प्रथा परंपरा म्हणून यापूर्वी ऐपतीप्रमाणे विवाह, बारसे, वाढदिवस, हळदीसारखे कार्यक्रम पार पाडले. आता या समाजातील बहुतांशी घटकांकडे जमिनी विकल्याने पैसा आला आहे. या पैशाच्या बळावर प्रत्येक समारंभ लाखो रुपयांची उधळपट्टी करून साजरा केला जात आहे. समाज विकासाच्या दृष्टीने हे खूप घातक आहे. वारेमाप होणाऱ्या खर्चात काटकसर करून साधेपणाने प्रत्येक सोहळा साजरा केला पाहिजे, असे एकमत वारकरी संप्रदायिक समाजोन्नत्ती महासंघाच्या डोंबिवलीतील सागाव येथील पिंपळेश्वर मंदिराच्या बैठकीत करण्यात आले. आगरी समाजातील कीर्तनकार, प्रवचनकार यांनी आपल्या विवेचनात याची माहिती देऊन समाजाचे प्रबोधन करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. पिंपळेश्वर मंदिरातील शंकर महादेवाला साक्षी ठेवून झालेल्या बैठकीला वसंत पाटील, प्रकाश म्हात्रे, अनंत शिसवे, शिवराम गायकर, दादा महाराज पनवेलकर, गंगाराम शेलार, संयोजक शरद पाटील यांच्यासह अंबरनाथ, कल्याण तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. अन्य समाजातील नागरिकांनी बैठकीला उपस्थिती लावली होती.