सातपुडा पर्वतराजीत वसलेला नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा. उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत सर्वार्थाने वेगळा. कधी कुपोषण तर कधी नर्मदा बचाव आंदोलनामुळे सातत्याने प्रकाशझोतात राहिलेल्या या भागातील वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती अनेकांना खुणावत असते. परंतु या संस्कृतीला एक वेगळाही पदर आहे, तो अंधश्रद्धेचा! गावातील एखाद्या महिलेला डाकीण ठरवून या अंधश्रद्धेने आजवर शेकडो महिलांना जगण्याचा हक्क नाकारला. त्यांना अनन्वित अत्याचारांना सामोरे जावे लागले. या अघोरी अंधश्रद्धेवर प्रभावीपणे उपाययोजना करण्याचा संकल्प नंदुरबारच्या पोलीस यंत्रणेने सोडला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून डाकीण प्रथा निर्मूलन समित्यांची स्थापना करून गावागावातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गावातील एखाद्या महिलेला डाकीण ठरवून अनन्वित अत्याचार करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. अवघे जग २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आणि महिलांना जवळपास सर्वच क्षेत्रात समान संधी उपलब्ध होत असताना शिक्षणात बराच पिछाडीवर असणारा आदिवासी बांधव अद्याप वेगवेगळ्या अंधश्रद्धेत गुरफटला आहे. त्यातील डाकीण ठरविण्याची प्रथा म्हणजे क्रूरतेचा कळसच. सुशिक्षितांचे प्रमाण कमी असल्याने गावकऱ्यांच्या डोक्यात ही अंधश्रद्धा अशी काही भिनली आहे की, ते कोणाचे ऐकण्यास तयार होत नाहीत. एखाद्या गावात काही विपरीत घटना घडल्यास गावकऱ्यांचे अकलेचे तारे तोडण्याचे काम सुरू होते. एखाद्या कुटुंबातील सदस्य एकसारख्या आजारांनी आजारी पडण्याचे कारणही त्यांना पुरेसे ठरते.
 या कुटुंबीयांमार्फत वैद्यकीय सल्ला घेण्याऐवजी मांत्रिक अर्थात भगताकडे धाव घेतली जाते. त्याच्यासमोर सर्व घडामोडींचा वृत्तान्त मांडला जातो. या अंधश्रद्धेला खतपाणी   घालणारा   प्रमुख   घटक  कोणी असेल तर तो हा मांत्रिक. कारण,   हा   मांत्रिक   गावातील   एखाद्या महिलेकडून या घटना घडत असल्याचे सांगतो. कशाला कशाचा  आधार  नसताना मांत्रिकाकडून विपरीत घडलेल्या घटनांचा दोष   एखाद्या  महिलेवर टाकला जातो.
महत्त्वाची बाब म्हणजे, मांत्रिक त्या महिलेचे नाव काही केल्या सांगत नाही. अंदाजपंचे काही ठोकताळे मांडून संबंधित महिलेच्या घराजवळील खाणाखुणा जमलेल्या गावकऱ्यांना सांगतो. हे आडाखे ज्या महिलेशी जुळतात, त्या स्त्रीवर डाकीण असल्याचे शिक्कामोर्तब केले जाते.
मांत्रिकाकडून ही तथ्यहीन प्रक्रिया पार पाडली गेली की, अंधश्रद्धा टोकाला जाण्यास सज्ज होते. डाकीण ठरविलेली महिला आर्थिक दुर्बल घटकातील असते. गावकऱ्यांचा प्रतिकार करण्याइतकी तिच्यात क्षमता नसते. आजवर डाकीण ठरविल्या गेलेल्या महिलांच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकल्यास हीच बाब लक्षात येते.
या महिलेचे हरप्रकारे शोषण केले जाते. मारहाण, शिवीगाळ, गावातून बहिष्कृत करून हकालपट्टी, कुटुंबातील सदस्यांना शक्य तितका त्रास देण्याचे सत्र सुरू होते. आपण डाकीण नसल्याचा टाहो संबंधित महिला फोडत असली तरी तिच्या आर्जवाकडे कोणी लक्ष देत नाही. अनेकदा कोणाच्या नजरेसमोर यायचे नाही म्हणून तिच्यावर बंधने लादली जातात. परिणामी, कित्येक महिलांवर  या   शोषणात गाव   सोडून    परागंदा  होण्याची वेळ आली आहे. कित्येकींना प्राणदेखील गमवावे लागले.
या अनिष्ट प्रथेत महिलांना नरकयातना सोसाव्या लागल्या आहेत. या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. संजय अपरांती यांनी केला. या अतिशय   गंभीर    प्रश्नाकडे   वैयक्तिक लक्ष घालून    अक्कलकुवा, तळोदा, मोलगी, म्हसावद या पोलीस ठाण्यांच्या    हद्दीतील    बाधित गावांचे दौरे केले.   स्थानिक    ग्रामस्थांशी  चर्चा करून १६२ डाकीण प्रथा निर्मूलन    समित्यांची   मुहूर्तमेढ रोवण्याचे  सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे.
    
ग्रामीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूण कामगिरीचा वेध लेखमालेतून घेत आहोत. या मालेतील पहिला लेख.