महिलांवरील अत्याचाराचे कारण आर्थिक स्थितीतच असून पुरुषांवर अवलंबून न राहता शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांनी केले. येथील महावीर भवनात पोलीस दलाच्या वतीने ‘कौटुंबिक हिंसा व स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधक कायदा’ या विषयावर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. ६५ लाख रुपये खर्चातून बांधलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन, तसेच आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या १० लाख रुपये निधीतून बांधण्यात येणाऱ्या प्रतीक्षालय भुवनाचे भूमिपूजन येथे झाले.
महिला मेळाव्यात बिष्णोई म्हणाले, की नांदेड परिक्षेत्रात प्रतिदिन ३ ते ४ महिलांचे मृत्यू, आत्महत्या, खुनाच्या घटना घडतात. यात हुंडाबळीचे प्रमाण अधिक आहे. महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी त्यांना शिक्षित करून स्वत:च्या पायावर उभे करण्याची गरज आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. महिलांना सहकार्याची गरज असल्याचे सांगून महिलांनी अन्यायाविरुद्ध बेधडक पोलिसात तक्रार द्यावी व पोलिसांनी महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.