तरुणपणी चर्चासत्रे, परिषदांमध्ये सहभागी असताना वैज्ञानिक चंद्रिमा साहा यांचे अस्तित्व कधीच जाणवले नसले तरी त्यांच्या संशोधनातून ते जाणवते. अजूनही विज्ञानात पुरेशा महिला नसल्या तरी त्यासाठी महिलांना आरक्षण देण्याची कल्पना मात्र त्यांना मुळीच मान्य नाही. चंद्रिमा साहा यांना आता त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजी या संस्थेच्या माजी संचालक असलेल्या साहा यांची आता भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या संस्थेचे प्रमुखपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला. त्या वैज्ञानिक असल्या तरी पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला क्रिकेट संघात त्या उपकर्णधार होत्या. आकाशवाणीवरील पहिल्या महिला क्रिकेट समालोचकाचा मानही त्यांच्याकडे जातो. महिलांनी आधी स्वत:वर विश्वास ठेवावा तरच त्या कुठल्याही क्षेत्रात नेतृत्व करण्यात यशस्वी होऊ शकतील असे त्यांचे मत आहे. आपल्याकडची शिक्षण पद्धती ही संशोधनाला उत्तेजन देणारी नाही त्यामुळे अनेक योजना असूनही त्यांचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. जीवशास्त्रज्ञाचा पिंड असलेल्या साहा यांनी पेशींच्या मृत्यूवर संशोधन केले असून लेशमनिया नावाच्या परोपजीवातील पेशींचा मृत्यू नियंत्रित करण्यात त्यांनी यश मिळवले. या प्रारूपाचा उपयोग कर्करोगातही होऊ शकतो. लेशमनिया जंतूंमुळे काला आजार होतो, त्यातील पेशींचे संशोधन केल्याने त्या जंतूंवरही मात करता येऊ शकेल. पेशींच्या वर्तनाशी निगडित असलेला सर्वात मोठा आजार म्हणजे कर्करोग. त्यातही या संशोधनाने एक पाऊल पुढे पडल्याचे समाधान त्यांना आहे. आताच्या नव्या पदाची जबाबदारी घेताना त्या स्थानिक भाषांतून विज्ञानप्रसारावर भर देणार आहेत. विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी आपण काम करू तसेच छद्म विज्ञानाला थारा देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. परदेशी संस्थांशी भागीदारीवरही त्या भर देणार आहेत कारण आजचे जग हे सहकार्याचे आहे. कोलकाता विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायॉलॉजी या संस्थेतून डॉक्टरेट केली असून नंतर उच्चशिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या. तेथे अनेक संधी असतानाही १९८४ मध्ये त्या भारतात परत आल्या. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी ही संस्था जानेवारी १९३५ मध्ये स्थापन झाली ती भारतात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी. या संस्थेचे एकूण ९२६ सदस्य आहेत.