मीराबाई चानू सैखोम  हिने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करताना ऑलिम्पिक पदक विजेत्या कर्नम मल्लेश्वरीचाच वारसा अबाधित राहणार, हेच जणू सिद्ध केले आहे. १९९४ आणि ९५ मध्ये मल्लेश्वरीने जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत सलग दोनदा सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली होती. मल्लेश्वरी ते चानू यांच्या जागतिक सुवर्णपदकांदरम्यानच्या दोन दशकांच्या भारतीय वेटलिफ्टिंगचा इतिहास नजरेखालून घालताना एकीकडे मल्लेश्वरीच्या ऑलिम्पिकमधील अभूतपूर्व यशामुळे देशाला अभिमान वाटतो, परंतु दुसरीकडे अनेक वेटलिफ्टिंगपटूंनी उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणामुळे भारताची मान शरमेने खाली झुकवल्याचे लक्षात येते.

१८९६च्या पहिल्या ऑलिम्पिकपासून पुरुषांसाठी वेटलिफ्टिंग हा खेळ अस्तित्वात आहे. पण २०००च्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच महिलांसाठी वेटलिफ्टिंगचे पदकांचे द्वार खुले झाले अन् आंध्र प्रदेशमधील एका छोटय़ाशा गावातील मल्लेश्वरीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेने प्राप्त केलेले हे पहिले पदक म्हणून सुवर्णाक्षरांनी अधोरेखित झाले. या यशानंतर मणिपूरसारख्या गावातून आता मीराबाईच्या रूपात आशेची किरणे दिसू लागली आहेत.

मीराबाईचा जन्म पूर्व इम्फाळ येथे सैखोम कुटुंबात ८ ऑगस्ट १९९४ मध्ये झाला. शालेय जीवनात मीराने जेव्हा वेटलिफ्टिंग खेळाचा वसा उचलला, तेव्हा तिच्या गावात याचा सराव किंवा प्रशिक्षण देणारे केंद्र नव्हते. मणिपूरमध्ये वेटलिफ्टिंगपटू कुंजराणी देवीचा आदर्श मानणारा मोठा वर्ग आहे. मीराबाईनेसुद्धा कुंजराणीकडूनच प्रेरणा घेतली. ती इतके वजन कसे काय पेलू शकते, याच इच्छाशक्तीने मीराने वेटलिफ्टिंगला प्रारंभ केला, तेव्हा आपल्याला पालकांना ते पटवून देण्याचे महत्त्वाचे आव्हान तिच्यापुढे होते आणि त्यांनी तिला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या १३व्या वर्षी ती दररोज ६० किलोमीटर अंतर रेल्वेने प्रवास करायची आणि खुमान लंपक क्रीडा संकुलात सराव करायची. येथूनच तिच्या स्वप्नांचा प्रवास सुरू झाला. कनिष्ठ गटातील त्या दिवसांपासूनच तिच्या खेळातील सातत्य कायम होते. कनिष्ठ गटातील मीराच्या व्यावसायिक कारकीर्दीला जेव्हा प्रारंभ झाला, तेव्हा तिच्यापुढे अनंत अडचणी होत्या. तिचे प्रशिक्षक तिला आहाराचा तक्ता द्यायचे. त्यात चिकन आणि दूध हे महत्त्वाचे घटक असायचे. मात्र त्या तक्त्याला न्याय देऊ शकणारी आर्थिक पुंजी तिच्या कुटुंबीयांकडे नव्हती; परंतु तिने हिमतीने अशा अनेक अडचणींवर मात केली. २०१३ मध्ये  कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला सर्वोत्तम लिफ्टर हा मान मिळाला. २०११च्या आंतरराष्ट्रीय युवा अिजक्यपद स्पर्धेत आणि कनिष्ठ गटाच्या दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या याच कामगिरीमुळे ती भारताचे भविष्य असल्याची ग्वाही क्रीडा क्षेत्राला मिळाली होती. मीराने ताश्कंद येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुंजराणीचा स्नॅचमधील विक्रम मोडीत काढत ८४ किलो वजन उचलले होते. याचप्रमाणे एकूण १९० किलो वजन उचलण्याच्या तिच्या विक्रमाचीही बरोबरी केली. मग २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या मीराने ४८ किलो वजनी गटात एकूण १७० किलो वजन उचलले होते. त्यानंतर २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली होती. मात्र तिच्याकडून घोर निराशा झाली.  आता २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून डागाळलेल्या वेटलिफ्टिंग खेळाला ऊर्जा देईल, अशी आशा मीराबाईकडून करण्यात येत आहे.