आराधना जोशी
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघायला मिळाला. पौगंडावस्थेतील मुलाला हवा तो मोबाईल पालकांनी दिला नाही याचा राग मनात ठेवून त्या मुलाने आपल्याच घरातील सामानाची तोडफोड केली. किचनमध्ये भरून ठेवलेलं सामान जमिनीवर ओतून त्यात बाहेरून आणलेली माती मिसळणं, बाथरूममधील सगळ्या वस्तू फोडणं (त्यातून भिंतीवरील आरसे आणि कमोडही सुटलं नाही), हॉलमधील फॉल्स सिलींगची नासधूस करणं, फर्निचर पेटवून देणं, बेडरूममध्ये गाद्या, कपडे फाडणं असा प्रकार केल्याचं त्यात बघायला मिळालं.

याशिवाय मॉलमध्ये आई वडील शॉपिंग करत असताना त्यांची मुलं काही विशिष्ट गोष्टीसाठी हातपाय झाडून, जोरजोरात रडत ती गोष्ट आपल्याला हवीच म्हणून हट्ट करत असल्याचे दृश्य कमी अधिक प्रमाणात आपण बघत असतो. ‘एक रट्टा द्या आणि गप्प करा त्याला, काय तमाशा लावला आहे,’ असा विचार इतरांच्या मनात डोकावत असतो. हट्ट करणाऱ्या मुलाचे आईवडील या सगळ्या प्रकारामुळे खजील झालेले असतात आणि हट्ट करणारं मूल ती वस्तू आपल्याला मिळणार आहे की नाही याचा अंदाज घेत असतं.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

हेही वाचा >> मुलांचं करिअर घडवायचं आहे, पण कसं? प्रत्येक आईने ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात!

खरंतर हट्ट करणं यामागे अनेकदा वेगवेगळी कारणे असतात. कधी मुलांना एखादी वस्तू खरोखरच हवी असते. ती वस्तू मिळाली तर त्यांना शाळेमध्ये, मित्र मैत्रिणींमध्ये मिरवता येतं. याशिवाय एखादी गोष्ट देण्याचं पालकांनी नाकारलं की मुलं हट्ट करतात. त्या वस्तूसाठी रडारड, आरडाओरडा, हातपाय आपटणं यासारखे प्रकार सुरू होतात. अनेकदा मात्र आई वडिलांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, त्यांनी थोडासा वेळ तरी आपल्याला द्यावा, आपल्याकडे बघावं यासाठी हट्ट केला जातो. इथूनच भावनिक नाट्य किंवा भावनिक ब्लॅकमेलिंग सुरू होतं.

मुलांच्या विकासासाठी मग तो शारीरिक असो किंवा मानसिक त्यांना पालकांकडून प्रेम, काळजी, संरक्षण, वेळ, त्यांनी केलेली प्रशंसा, कौतुक अशा गोष्टी हव्या असतात. जर वेळच्या वेळी या गोष्टी पालकांकडून मुलांना दिल्या जात असतील तर मुलांचं भावविश्व स्थिरावलेलं असतं. पण या गरजा जर पूर्ण होत नसतील आणि मुलं हट्ट करत असतील तर ती धोक्याची घंटा मानायला हवी.

हेही वाचा >> अहो, तुमचा मुलगा स्वयंपाक करतो? फक्त जेवण नाही, पण ‘हे’ ही शिकवा..

मुलांनी वयाप्रमाणे हट्ट करणं यात चुकीचं काहीच नाही. पण टोकाचा हट्ट मुलांनी करणं, पालकांना तो हट्ट पुरवता न येणं, यामुळे पालकांचा आरडाओरडा आणि मुलांची रडारड असं चित्र अनेकदा बघायला मिळतं. अशा हट्टी मुलांशी कसं वागायचं? त्यांच्याशी डील कसं करायचं हे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही आणि मग मुलांच्या हट्टाला बळी पडून किंवा चारचौघांमध्ये होणारी शोभा टाळण्यासाठी मुलांचे हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

मध्यंतरी एका ८०-१० वर्षांच्या ओळखीच्या मुलाला असंच हट्ट करताना आणि त्याने केलेला तमाशा बघायला मिळाला. चार दिवसांनी तो मुलगा एकटा भेटल्यावर त्याला या प्रसंगाबद्दल विचारलं तर म्हणाला, आईबाबा ती वस्तू देणार नाहीत याची पूर्ण खात्री होती पण तरी पूछने में क्या जाता है? मनात विचार आला त्या ठिकाणी आपली मुलगी असती तर आपण काय केलं असतं? अनेक पालकांनाही हाच प्रश्न पडतो की हट्टी मुलांना हाताळायचं कसं?

मुलं टोकाची हट्टी असली की पालकांचाही रागाचा पारा चढतो. पालकांना वाटते की आपला आवाज वाढवला तर मूल दबेल. पण होतं उलटंच. हट्टी मुलं पेटून उठतात. पालकांना  जे समजून सांगायचं ते बाजूलाच राहातं आणि पालक-मुलांमधे नवीनच भांडण सुरु होतं. हे टाळण्यासाठी मुलं हट्ट करत असतील तेव्हा पालकांनी शांत राहण्याचं धोरण स्वीकारावं. त्यांच्याशी प्रेमाच्या सूरात बोलावं. त्यांच्याशी समजुतीनं वागून काय बरोबर काय चूक यातला फरक शांततेनं समजून सांगावा. मुख्य म्हणजे आपल्या म्हणण्यावर ठाम राहावे.

हट्टी मुलं अनेकदा वाद घालायला लागतात. अशा वेळेस पालकांनीही या वादात उडी घेतली तर मुलांना नेहेमी वाद घालण्याची सवय लागते. यासाठी मुलं हट्ट जरी करत असली तरी आधी पालकांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायला हवं. आपले आई वडील आपलं शांतपणे ऐकून घेत आहेत असं बघितल्यावर मुलांचा चढलेला आवाज खाली येतो. मुलंही आई बाबा जेव्हा बोलतात तेव्हा वाद न घालता ऐकून घेण्याचा प्रयत्न करता. हे वारंवार व्हायला लागलं की काही काळानं मुलांचा हट्ट कमी व्हायला लागतो. मुलांना बोलण्याचा, आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करण्याएवढा वेळ पालकांनी द्यायला हवा. आपल्याला जे सांगायचंय ते मुलांचं पूर्ण बोलून झाल्यावर सांगावं. यामुळे आई बाबा आपलं ऐकतात तसं आपणही आई बाबांचं ऐकून घ्यायला हवं याची जाणीव हळूहळू मुलांना व्हायला लागते.

वयात येणाऱ्या मुलांचा हट्टीपणा अनेकदा टोकाचा असतो. अशावेळी पालकांची अधिक पंचाईत होते कारण हट्ट पुरवला तर त्या हट्टीपणाला प्रोत्साहन दिल्यासारखं होतं आणि नकार दिला तर मुलांची चिडचिड सहन करावी लागते. ‘नाही’ हा शब्द ऐकण्याची आणि तो पचवण्याची मानसिकता तयार करणं अनेकदा अवघड बनतं. यासाठी लहानपणापासून नकार पचवायला मुलांना शिकवायला हवा. आम्हाला मिळालं नाही म्हणून आमची मुलं मागेल ते देऊ ही पालकांची मानसिकताच हट्टीपणाला खतपाणी घालणारी असते. याकडे पालकांनीही वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तसं झालं तर पालकत्व सुसह्य होईल.