कोमल ही व्यवसायाने आर्किटेक्ट. तिचं वेळेत होणारं काम आणि त्याचा दर्जा पाहून चांगले मोठे मोठे प्रोजेक्ट्स तिला मिळू लागले. सकाळी आठ वाजता घराबाहेर पडून रात्री नऊलाच परत येणारी ती आपल्या कामाप्रती अत्यंत एकनिष्ठ होती. सगळं छान मनासारखं होत होतं, पण आताशा ती जरा दडपणाखाली दिसत होती. तिच्या मोठ्या बहिणीला तिच्यातील बदल जाणवला होता आणि हेही लक्षात आलं होतं की महिन्याभरात होणाऱ्या तिच्या लग्नामुळे ती अस्वस्थ आहे. 

“काय झालं कोमल? तू आजकाल इतकी बेचैन का असतेस? पती म्हणून तुला विराट योग्य वाटत नाहीये का?” 

हेही वाचा… मैत्रिणींनो उद्योग-व्यवसाय करताय?… मग या ७ अर्थविषयक टिप्स वाचाच!

“तसं नाही ग ताई. विराट बद्दल काहीच तक्रार नाही. मला इथली बसलेली घडी मोडून सासरी जायला नको वाटतंय. मी लग्नानंतर इथेच राहू का?” तिच्या ह्या अशा प्रश्नामुळे ताई दचकली. कोमल पुढे म्हणाली, “लग्न झालं म्हणून आता माझ्या ऐन भरात आलेल्या कामाबाबतीत मी दिरंगाई करून नाही चालणार. बारा तेरा तास काम आवश्यक असतं मला. तिथे त्यांच्याकडे मोठं कुटुंब, कामवाल्या बायकांना जास्त काम न सांगता बरीच कामं घरातच करतात ते. आणि त्याबाबतीत आग्रही आहेत खूप. स्वयंपाक घराच्या बाईनेच करावा वगैरे मत असलेली मंडळी आहेत ती. आता मी काय रात्री दहा वाजता येऊन पोळ्या लाटायच्या का? एखाद दिवशी ठिक आहे, पण रोजच म्हटल्यावर मला नाही जमणार. असं नाही की मी घरच्या कामाला कमी लेखते. ते अर्थातच खूप महत्त्वाचं आहे, पण मला ते बिलकुल नाही जमणार… तितका वेळच नाही माझ्याकडे. मला तर तिकडे जायच्या नावानेच पोटात गोळा आलाय. मी लग्न करेन, पण सासरी जाणार नाही इथेच राहीन. मला माझा कंफर्ट झोन अजिबात सोडायचा नाहीये!” 

हेही वाचा… अतूट नातं-भावा बहिणीचं

“तू विराट जवळ हे बोलून दाखवलस? त्याला विचार, की तो इथे आईकडे येऊन राहायला तयार आहे का? म्हणजे घरजावई व्हायला तयार आहे का?” 

कोमल विचारात पडली. खरंच काय हरकत आहे? मी सासरी न जाता तोच इथे येऊन राहिला तर? इथे कामाला बायका आहेत, आई पण जॉब करते त्यामुळे तिला सपोर्ट स्टाफ लागतो. तोच सेटअप आम्हीपण वापरू. सगळं किती सोपं होईल नाही? 

तिनं तो विचार विराटला बोलून दाखवला. आधीतर त्यानं हसण्यावारी नेलं. असं कसं शक्य आहे म्हणून उडवून लावलं, पण कोमल ने नीट समजावून सांगितल्यावर मात्र तो विचारात पडला. आपल्याला कुणी मुलगी असा काही प्रश्न विचारेल हा विचारही त्याने केला नव्हता. दोन दिवस विचार केल्यावर त्याने आपल्या घरी हा विषय काढला. 

हेही वाचा… घरातील वृद्धांचं ‘पालकत्त्व’ ही केवळ घरातल्या बाईचीच जबाबदारी असते का?

त्याच्या आईला आधी तर होणाऱ्या सुनेचा राग आला. पण नंतर तिचं काम, तिचे नवीन प्रोजेक्ट्स आणि जबाबदारी नीट समजावून सांगितल्यावर तिची नेमकी बाजू त्यांच्या लक्षात आली. त्यांनी कोमलला बोलावून घेतलं. म्हणाल्या, “माझ्या सारख्या बाईला आपली सून बाहेर नेमकं काय करते याची कल्पना नाही येत ग. विराटने मला नीट समजावून सांगितलं. अजिबात काळजी नको करूस. लग्नानंतर तू पूर्णपणे तुझ्या करिअर कडे लक्ष दे. आपण घराच्या सगळ्या कामाला मदतनीस ठेवू, पण त्याला घर जावई होण्याची गळ नको घालूस बाई. मुलगी सासरी जाऊन लवचिक मनाने नवीन वातावरणात स्वतःला रुळवण्याचा प्रयत्न करू शकते. निसर्गतःच तिला ती देणगी मिळाली आहे. हा पोरगा तुझ्या आईवडिलांशी जुळवून घेईल, नाही असं नाही, पण एकूण प्रकरण अवघडच बाई! घरजावई ही संकल्पना पचवायला जरा जडच ग. तू काळजी नको करून आपण एकदम छान मार्ग काढू यातून. तुला पूर्ण वेळ तुझ्या कामाला देता येईल असं बघू. मग तर झालं?” सासूबाईंनी असं आश्वासन दिल्यावर कोमल बाई एकदम खूष झाल्या आणि भलतंच संकट टळलं म्हणून विराटने सुटकेचा निःश्वास टाकला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

adaparnadeshpande@gmail.com