First Indian Woman To Summit Mount Everest : सर्वांत कठीण आणि उंच असणाऱ्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणाऱ्या बचेंद्री पाल यांचा जन्म पर्वतरांगांनी वेढलेल्या उत्तराखंडमधील नाकुरी या प्रदेशात २४ मे १९५४ साली झाला. तिचा हा प्रवास अशा धाडसी क्षेत्रांमध्ये येऊ पाहणाऱ्या अनेकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरलेला आहे. इतकेच नाही, तर स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी समाजाने आखून दिलेल्या गोष्टींची चौकट मोडून काढली आहे.

हिमालयीन पर्वतरांगांच्या सान्निध्यात बचेंद्री पाल अगदी सध्या कुटुंबात लहानाची मोठी झालेली आहे. इतकेच नाही, तर लहान असल्यापासून बचेंद्री यांना पर्वतांबद्दल ओढ आणि प्रेम वाटू लागले होते. असे असले तरीही त्या काळात इतर स्त्रिया, मुली जे करतात, तेच बचेंद्रीनेदेखील करावे, अशी समाजाची अपेक्षा होती. मात्र, ती सर्व बंधने, अपेक्षा यांचा विचार न करता, बचेंद्री यांना ज्या गोष्टीतून सर्वाधिक आनंद मिळणार होता, तेच करण्याचा त्यांनी धडाडीचा निर्णय घेतला आणि गिर्यारोहण या धाडसी खेळाच्या क्षेत्रात एक वर्चस्व प्रस्थापित केले.

हेही वाचा : लिसा स्थळेकर : भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा श्रीवत्स ते सिडनीचा प्रवास

Trek to Glory- बचेंद्री पाल यांचा प्रवास

जगातील सर्वांत उंच आणि सर्वांत अवघड असणारे माउंट एव्हरेस्ट [उंची- २९,०२८ फुट] हे पर्वत शिखर १९८४ साली बचेंद्री पालने सर केले आणि इतिहास रचला. हा पराक्रम केवळ त्यांच्या स्वतःसाठी खास नसून, आपल्या देशासाठीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि अभिमानास्पद आहे. कारण- माउंट एव्हरेस्टच्या टोकावर पोहोचणारी, बचेंद्री पाल ही जगातील पाचवी; तर भारतीय पहिली महिला गिर्यारोहक ठरली होती. इतकेच नव्हे, तर त्या काळात स्त्रियांना खूप काही करण्याची संधी नसायची किंवा दिली जायची नाही. महिलांनी केवळ घर आणि आपले कुटुंब सांभाळावे, धाडसी गोष्टी करू नयेत, पुरुषाशी बरोबरी करू नये, अशी तेव्हाच्या समाजाची अपेक्षा होती. मात्र, बचेंद्रीच्या एका पराक्रमामुळे सर्व अपेक्षा, रूढी, मागासलेले विचार हजारो मैल मागे सोडून, माउंट एव्हरेस्ट सर करून कितीतरी स्त्रियांना, गिर्यारोहण करू इच्छिणाऱ्या महिलांना, त्यांना जे हवे ते करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

आपला वारसा पुढे नेला :

माउंट एव्हरेस्ट हे पर्वत शिखर सर केल्यानंतरसुद्धा बचेंद्री पाल यांनी गिर्यारोहणात आपला अनमोल वाटा दिलेला आहे. नॅशनल अॅडव्हेंचर फाऊंडेशनमध्ये एक प्रशिक्षक म्हणून काम करीत, ज्यांना डोंगर वा पर्वत चढण्याची इच्छा आहे, गिर्यारोहणाची कला शिकण्यात रस आहे अशांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे.

हेही वाचा : Recipe : ‘या’ पद्धतीने बनवलीत तर सिमला मिरचीसुद्धा सगळे आवडीने खातील; भाजीची रेसिपी, प्रमाण लिहून घ्या….

बचेंद्री पाल यांना मिळालेले पुरस्कार

बचेंद्री पाल यांच्या उत्कृष्ट कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. १९९० साली त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले होते. गिर्यारोहण हा फार अवघड आणि अत्यंत धाडसी असा खेळाचा प्रकार आहे. बचेंद्री पाल यांच्या गिर्यारोहणातील आणि क्रीडा क्षेत्रातील धडाडीची कामगिरी लक्षात घेऊन, भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या प्रत्येक तरुणीला या धाडसी खेळाच्या प्रकारात पुढे आणण्यासाठी बचेंद्री पाल या प्रयत्नशील आहेत. त्यासाठी मुलींना योग्य ते प्रशिक्षण देणे, त्यांना संधी देणे अशा खेळांमुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होतो अशा गोष्टी त्या शिकवतात आणि नवीन पिढीला तयार करतात. अशी माहिती झी न्यूजच्या एका लेखावरून समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक बंधनांना झुगारून, स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहकाबद्दल सांगावे तेवढे कमीच आहे. कोणतेही क्षेत्र असू दे; स्त्रियादेखील पुरुषाइतक्याच सक्षम असतात, हे बचेंद्री पाल यांच्या कामगिरीतून स्पष्ट होते. त्यामुळे एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असल्यास आणि त्यानुसार मनापासून एकदा ठाम निश्चय केल्यानंतर तुम्ही अगदी माउंट एव्हरेस्टसुद्धा सर करू शकता ही गोष्ट विसरू नका.